मुंबई : प्रतिनिधी
हिंसाचार समाज स्वास्थ्यासाठी चांगला नाही आणि औरंगजेब हा आजच्या घडीला सुसंगत नाही, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडली आहे. आरएसएसच्या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आरएसएसची भूमिका आम्ही त्यातले नाही, असे सांगणारी असून, हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नाना पटोले यांनी व्यक्त केली.
दरम्यान, औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी म्हणून राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलने आणि निदर्शने करण्यात आली. विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेतही याबद्दलची मागणी करण्यात आली. पण, नागपूरमध्ये यावरून हिंसाचार उसळल्यानंतर हा मुद्दा जास्त तापला आहे. या मुद्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रथमच भूमिका मांडताना औरंगजेब आजच्या घडीला सुसंगत नसून, हिंसाचारही समाजाच्या स्वास्थ्यासाठी चांगला नाही, असे स्पष्ट केले.
नाना पटोले म्हणाले, घटना झालेली आहे. आरएसएसनेच आणलेलं सरकार आहे. आरएसएसने आणलेल्या सरकारमधील मंत्री धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांचे कान का टोचले नाहीत? महाराष्ट्र पेटल्यानंतर आता आम्ही त्यातले नाही, हे सांगणे चुकीचे आहे. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे.
संघाचे म्हणणे मान्य : विहिंप
विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ पदाधिकारी गोविंद शेंडे म्हणाले, औरंगजेब सुसंगत विषय नाही, हे संघाने म्हटलेले आम्हाला मान्य आहे. पण, औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे आणि त्याचे समर्थन करणे, हे आम्हाला मान्य नाही. त्याला आदर्श ठेवणे आम्हाला मान्य नाही.