खा. संजय राऊत यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पेटलेला औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा आता राज्यसभेत पोहचला. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी हाच मुद्दा आज राज्यसभेत उपस्थित केला. मणिपूरनंतर महाराष्ट्र जळत आहे, नागपूरमध्येही दंगली होत आहेत. गृह मंत्रालयाने गेल्या काही वर्षांत देशाला पोलिस स्टेट (सरकारी नियंत्रण) बनवले आहे. औरंगजेबाची कबर तोडण्यासाठी तुमच्या परदेशात शिकत असलेल्या मुलांना पाठवा असेही म्हटले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते.
गृह मंत्रालयाच्या कामकाजावरील चर्चेत सहभागी होत राऊत यांनी सरकारवर टीका केली. त्यांनी आरोप केला की, देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करणा-या शक्ती वारंवार औरंगजेबाचे नाव घेत आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि केंद्र सरकारमधील वरिष्ठ पदांवर असलेल्या लोकांचा समावेश आहे.
जर तुम्हाला औरंगजेबाची कबर तोडायची असेल तर खुशाल तोडा, तुम्हाला कोण रोखत आहे. केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार आहे. मुख्यमंत्री तुमचे आहेत, गृहमंत्री तुमचे आहेत तिथे जावा आणि तोडा. पण कबर तोडण्यासाठी तुमच्या मुलांना पाठवा आमच्या नाही. तुमची मुले परदेशात शिक्षण घेत आहेत, परदेशात नोकरी करत आहेत आणि गरीब मुलांची माथी भडकावून ही कामे करायला लावत आहात.
महाराष्ट्र जळतोय
आतापर्यंत मणिपूर जळत होते पण आता महाराष्ट्रही जळत आहे. गेल्या ३०० वर्षात नागपूरमध्ये एकही दंगली झालेली नाही. पण आता औरंगजेबाचे नाव पुन्हा पुन्हा घेऊन देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करणा-या शक्तींपैकी काही महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि केंद्र सरकारमधील वरिष्ठ पदांवरील लोक आहेत. जर आपण त्यांना रोखले नाही तर हा देश एकसंध आणि एकात्मिक राहणार नाही, असेही राऊत म्हणाले.
अखंडता राखणे
गृहमंत्रालयाचे काम
देशाची एकता आणि अखंडता राखणे हे गृह मंत्रालयाचे काम आहे, परंतु गेल्या काही वर्षांत देशाचे रूपांतर पोलिस स्टेटमध्ये (सरकार नियंत्रित) झाले आहे. गृह मंत्रालय राजकीय विरोधकांना कमकुवत करत आहे आणि राजकीय पक्ष फोडत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.