नागपूर: उपराजधानी नागपूर शहरात अपराधांची मालिका सुरूच आहे. बघता बघता गुंडांवर कुणाचाच वचक राहिलेला नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामागील कारण म्हणजे, सध्या सुरू असलेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अनेक हत्या आणि अपराधांच्या घटनांनी शहर हादरले आहे.
त्यामुळे शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. असे असताना नागपूर शहरात आणखी एका घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मुलीशी बोलण्याच्या क्षुल्लक कारणावरून आठ गुंडांनी चाकूच्या धाकावर एका कॅफे मालकाचे भर दिवसा अपहरण केले.
त्यानंतर त्याला निर्जन जागी घेऊन जात बेदम मारहाण केली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.