लातूर : प्रतीनिधी
उन्हाळा आला की थंडपेय पदार्थाच्या विक्रीची दुकाने सजू लागतात. मात्र, शीतपेये अथवा बर्फाचा गोळा घेताना त्यात वापरल्या जाणा-या गुणवत्तेबाबत शंका कुणालाच येत नाही. उन्हाची उष्णता कमी करण्यासाठी बर्फ गोळा विकणा-या गाड्यांजवळ लहान-मोठ्यांची गर्दी पाहायला मिळते. परंतु बर्फ गोळा खाणे वैद्यकीयदृष्ट्या शरीरास हानीकारक आहे. ब-याच बर्फ कारखान्यात दूषित पाण्यापासून बर्फ तयार करण्यात येतो. अशा कारखान्यांची अन्न व औषध प्रशासन विभागाने वारंवार तपासणी करावी, अशी मागणी शहरातील नागरीकांडुन होत आहे.
रासायनिक रंगाचा वापर रासायनिक रंग निकृष्ट दर्जाचे पाणी आणि सॅकरीनपासून गोळा व आईस कॅन्डी तयार केली जाते. वाढत्या महागाईमुळे यात मिसळणारे उच्च प्रतीचे रंग, साखर बर्फ गोळा विकणा-यांच्या आवाक्याबाहेर आहेत. चांगल्या प्रतीचे उत्पादन तयार करताना उत्पादनाचा खर्च वाढतो. त्यामुळेच निम्न दर्जाचा रंग आणि सॅकरीनचा विक्रेते उपयोग करतात. बर्फ गोळ्यांच्या स्वरुपात आजार विकत आहोत. याची कल्पना विक्रेत्यांना असते. पण कारवाई अभावी हे व्यवसाय धडाक्यात सुरू आहेत. विक्रेत्यांच्या ठेल्यावर अस्वच्छता बर्फ गोळे असतात. त्यातच गोळा तयार करताना बर्फ लोखंडाच्या ब्लेडमधून किसला जातो. या ठेल्यावर ब-याचदा रासायनिक रंगाच्या बाटल्या उघड्यावर ठेवलेल्या असतात. शिवाय बर्फाचे गोळे रस्त्यावर विकण्यात येत असल्यामुळे आपल्याला न दिसणारे धूळीचे कण त्यात मोठ्या प्रमाणात मिसळलेले असतात. कारखान्यातही बर्फ मोठ्या आकाराचा व्हावा व तो जास्त काळ टिकावा, यासाठी त्यावर मोठ्या प्रमाणावर रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्यामुळे बर्फ तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचे पाणी वापरले जाते, याचा उल्लेख कारखान्यात दर्शनी भागात करणे बंधनकारक आहे. परवाना बंधनकारक अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नियमानुसार खाद्य बर्फ विक्रेत्यांनी परवाना घेणे बंधनकारक आहे.
जे उत्पादक विनापरवाना व्यवसाय करतील त्यांच्यावर कलम ६३ नुसार सहा महिन्यांपर्यंत शिक्षा व पाच लाख रुपये दंडाची तरतूद आहे. एखाद्या बर्फाच्या उत्पादकाने त्यामध्ये निळा रंग न वापरल्यास अन्नसुरक्षेच्या नियमानुसार कारवाई करण्यात येते. दूषित बर्फामध्ये इ-कोलाय या शरीराला घातक असलेल्या विषाणूचे प्रमाण किती आहे. या दृष्टीने विभागातर्फे हॉटेल, रेस्टॉरंट, ज्यूस सेंटर, बर्फाचे गोळे तयार करून विकणा-या विक्रेत्यांची अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे तपासणी करण्यात येते का? असा प्रश्न नेहमीच नागरीकांना पडलेला असतो. गेल्या अनेक वर्षापासून अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे शहरातील कुटल्याही हॉटेल, रेस्टॉरंट, ज्यूस सेंटर, बर्फाचे गोळे तयार करण्यारी फॅक्टरी यांची अद्याप तपासणी करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.