लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयातील प्रत्येकाच्या घरात नळाने पाणी आले पाहिजे, यासाठी केंद्र शासनाने जल जिवन मिशन हाती घेतले. या कामाची गुणवत्ता तपासणीसाठी राज्य शासनाने नेमलेल्या टाटा कन्स्लटंन्सी सर्व्हीसेस या एजन्सीने जल जिवन मिशनच्या कामात तब्बल ५०० त्रूटी काढल्या. त्यांनी जल जिवनच्या कामात सुधारणा होणे आवश्यक असल्याच्या सुचना केल्या आहेत. कामाच्या संदर्भाने निघालेल्या त्रूटी जिल्हयातील त्या-त्या तालुक्यातील उप व कनिष्ठ अभियंत्यांना सांगून त्या दूर करण्यासाठी दोन दिवस लातूर जिल्हा परिषदेला बोलावले होते. त्यामुळे शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात उप व कनिष्ठ अभियंत्यांची गर्दी दिसून आली.
लातूर जिल्हा परिषदेच्यावतीने गेल्या दोन ते तीन वर्षापासून जल जिवन मिशनची ९२७ कामे सुरू आहेत. ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला दिवसाला ५५ लिटर पाणी देण्यासाठी सुरू असलेल्या योजना बळकटी करणाच्या व कार्यात्मक नळ जोडणीच्या कामांची राज्य शासनाने नेमलेली टाटा कन्स्लटंन्सी सर्व्हीसेस ही एजन्सी तीन टप्यात तपासणी करते. या एजन्सीने ९२७ कामांची पाहणी करून तब्बल ५०० च्या जवळपास त्रूटी निदर्शनास आणून दिल्या आहेत. यात कांही ठिकाणी वॉल बसवला नाही,
कामांचे फिनीसींग व्यवस्थीत नसणे, एजन्सीने सांगीतल्या प्रमाणे प्रत्येक स्टेजवरचा रिपोर्ट एजन्सीला न मिळणे अशा अनेक त्रूटी निदर्शनास आणून दिल्या. त्रूटी दूर केल्याशिवाय कामे पूर्ण होत नाहीत. जिल्हयात ९२७ पैकी आज पर्यंत २९७ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरीत ६३० कामे प्रगती पथावर आहेत. टाटा कन्स्लटंन्सी सर्व्हीसेस या एजन्सीने जल जिवनच्या कामाची साईटवर जाऊन, तसेच कागदोपत्रांची प्रत्यक्ष तपासणी केली आहे. कामात आढळलेल्या त्रूटी वेळीच दूर करण्यासाठी शुक्रवारी निलंगा, चाकूर, अहमदपूर, जळकोट, देवणी तालुक्यातील उप व कनिष्ठ अभियंत्यांना बोलावण्यात आले होते. तसेच शनिवारी लातूर, रेणापूर, औसा, उदगीर व शिरून अनंतपाळ येथील उप व कनिष्ठ अभियंत्यांना बोलावण्यात आले आहे.