नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५-२६ सालासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरील कर माफ करण्यात आला आहे. मोदी सरकारने मध्यमवर्गाला दिलेला हा मोठा दिलासा आहे. त्यापाठोपाठ आता टोलमध्येही सरकार गुड न्यूज देणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये याबाबतचे संकेत दिले आहेत.
सरकारच्या योजनेतून लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे गडकरी यांनी सांगितले. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रदूषण आणि वाहतूकीची समस्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी अनेक योजना सुरु केल्या जाणार आहेत. त्यासाठी त्यांच्या मंत्रालयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
नव्या योजनेमुळे टोल समाप्त होणार का? या प्रश्नावर गडकरी यांनी सस्पेंस कायम ठेवला. या योजनेची घोषणा लवकरच केली जाईल असे त्यांनी सांगितले. सरकार उपग्रहावर आधारित टोल पद्धतीवर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतही निर्णय होणार आहे. पण, हा निर्णय या योजनेपासून वेगळा आहे. आगामी काळात टोल देणा-यांची नाराजी दूर केली जाईल, असे गडकरी यावेळी म्हणाले.