जळगाव : महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. भाजपने शिवसेना (ठाकरे गट) ला मोठा धक्का दिला आहे. जळगावच्या एरंडोलमधील अनेक दिग्गज नेते आणि पदाधिका-यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्षांकडून महापालिका निवडणुकांची तयारी केली जात आहे. महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच अनेक दिग्गज नेते, आजी-माजी आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते सत्ताधारी पक्षात प्रवेश घेत आहेत. नुकतेच शिवसेना शिंदे गटाकडून ‘ऑपरेशन टायगर’ सुरू झाले. तर भाजपकडून विरोधी कार्यकर्त्यांना वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता नुकताच भाजपने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.
जळगावच्या एरंडोलमधील तीन माजी नगराध्यक्ष, पंचायत समितीचे दोन माजी सभापतींसह इतर पदाधिका-यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी, माजी उपनगराध्यक्ष आणि माजी नगरसेवक भाजपमध्ये सहभागी झाले. मुंबईतील भाजप कार्यालयात मंत्री गिरीश महाजन, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
तसेच एरंडोल विधानसभेतून अपक्ष निवडणूक लढवणारे भगवान महाजन यांनीही भाजपमध्ये प्रवेश घेतला. उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन यांच्यासह पदाधिका-यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभेनंतर ठाकरे गटातील अनेक प्रमुख पदाधिका-यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे तालुक्यात राजकीय समीकरणे बदलली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे.