सोलापूर :
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने आपल्या घरामध्ये असणारे बॅरल, हौद, रांजण, सिंटेक्स टाक्या ज्या गोष्टींमध्ये आपण पाणी साठवून ठेवतो. पाणी पिण्याचे असो किंवा वापरण्याचे; हे पाणी आठवड्यातून किमान एकदा वरील सर्व भांडी घासून, पुसून, कोरडे करून धुवावेत. जेणेकरून डासांच्या मादीने घातलेली अंडी नष्ट होतात. हे केल्यामुळे आपल्या घरामध्ये डासांची निर्मिती होणार नाही. यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केले आहे.
याबाबत विस्ताराने बोलताना ते म्हणाले, घराच्या अवतीभोवतीचा संपूर्ण परिसर घराच्या टेरेसवर आपण ठेवलेल्या टाकाऊ वस्तू उदाहरणार्थ कलरचे रिकामे डबे, टायर, मडके, कोंबड्यांना ठेवलेली गुंडग्या, गाडगे, भंगार साहित्य या वस्तूंमध्ये सुद्धा पाणी साठवून डेंग्यूच्या डासांची निर्मिती होते. म्हणून आपण या वस्तू पालथ्या घालाव्यात किंवा आडोशाच्या
ठिकाणी पुन्हा पाणी जाणार नाही, अशा ठिकाणी ठेवाव्यात.
त्याचबरोबर घराच्या अवतीभवती आपण टाकून दिलेली नारळाची करवंटी, दुधाच्या डवे, तुकडे दह्याचे पिशव्या, थर्माकोलचे म्हणजेच घराच्या अवतीभवती असणारा पडलेला कचरा हा सुद्धा गोळा करून नष्ट करण्यात यावा. आपल्याच घरामध्ये आपण ठेवलेला फ्रिजच्या पाठीमागील बाजूस पाणी साठते. त्यामध्ये सुद्धा डेंग्यू चिकनगुनिया मलेरिया यासारख्या आजाराची डासांची निर्मिती होते. संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छता, ड्राय डे पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तीव्र ताप, थंडी, डोकेदुखी, डोळ्यांच्या खोबण्यामध्ये दुखणे, अंगावर लालसर चट्टे किंवा पुरळ तसेच चिकनगुनिया मध्ये वरील लक्षणे दिसून येऊन सोबत संपूर्ण शरीराच्या सांध्यामध्ये तीव्र वेदना होणे, पेशंट वाकून चालतो आणि दम लागतो. कृपया सदर लक्षणे आढळल्यास आपल्या शासकीय दवाखान्यामध्ये रक्ताची तपासणी करून निदान करावे. त्याचबरोबर भरपूर पाणी पिणे, आराम करणे, किवी, ड्रॅगन फळ यासारखी फळ खावीत. आपल्याकडील असणाऱ्या गावातील आशा स्वयंसेविका यांना कळवून माहिती द्यावी.