नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर या दहशतवाद्यांच्या मागे पाकिस्तानच्या असलेल्या भूमिकेसंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्णायक कारवाई सुरु केली आहे. भारताने परदेशी सरकारांच्या समोर तांत्रिक आणि मानवी खब-यांबाबत मिळालेले गुप्तचर पुरावे सादर केले आहेत. यातून या मागे पाकिस्तानच्या अतिरेकी संघटनांचा थेट सहभाग असल्याचे पक्के पुरावे भारताने सादर केले आहेत.
भारतीय तपास यंत्रणांनी या हल्ल्याला जबाबदार असलेल्या अतिरेक्यांची ओळख पटवली आहे. तपासात या हल्ल्यात सामील अतिरेक्यांचा थेट संबंध ‘द रेजिस्टेंस फ्रंट’ बरोबर असल्याचे उघडकीस आले आहे. ही संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित शाखा आहे. इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्समध्ये या अतिरेक्यांचे सिग्नल पाकिस्तानच्या दोन ठिकाणांशी जुळलेले आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी १३ राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसातच अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जपान, इस्रायल, इटली, इजिप्त, जॉर्डन, सौदी अरब, नेपाळ, मॉरीशस, डच आणि ऑस्ट्रेलिया सारख्या १३ देशांच्या प्रमुखांशी संपर्क साधला आहे. सर्व नेत्यांनी या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध व्यक्त केला आहे. आणि भारताला पाठींबा दिला आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी देखील परराष्ट्र मंत्री आणि डिप्लोमेटीक अधिका-यांशी संवाद साधत भारताची बाजू मांडली आहे.
दिल्लीत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिका-यांनी ३० हून अधिक देशांच्या डिप्लोमेटीक अधिका-यांशी भेट घेत भारतात परदेशी पर्यटक संपूर्ण सुरक्षित असल्याचे आश्वस्त केले आहे.
संपूर्ण जगाचा भारताला पाठींबा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा हल्ला ‘भयानक’ असल्याचे म्हटलं आहे. भारत आणि पाकिस्तान संवादाद्वारे हा प्रश्न सोडवतील असा विश्वास व्यक्त केला. भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी इराण आणि सौदी अरेबियाने दाखवली आहे. फ्रान्स, इस्रायल, जपान, इटलीसह अनेक देशांनी दहशतवादाविरुद्ध भारतासोबत आम्ही उभे आहोत असे आश्वासन दिले आहे.