बीड : प्रतिनिधी
बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र भालचंद्र गणपती देवस्थानाजवळील वटवृक्षाला मंगळवारी सकाळी आग लागली. हे वडाचे झाड अडीचशे वर्षे जुने आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तब्बल २ तासांनंतर ही आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या पथकाला यश आले.
दरम्यान, ही आग विझवित असताना अग्निशमन दलाच्या पथकाला अनेक समस्या आल्या. आग आटोक्यात आणताना पाणी संपल्याने लिंबागणेश येथील गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करणा-या दादाराव येडे यांनी विनामूल्य पाणी उपलब्ध करून दिले. दरम्यान, बीड वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या दोन कर्मचा-यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
या भीषण आगीत वटवृक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या झाडावर वास्तव्यास असलेल्या पक्ष्यांची घरटी आगीत जळून खाक झाली आहेत. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे व विक्रांत वाणी यांनी बीड अग्निशमन दलाला तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी काकडे यांना फोटो आणि व्हीडीओ पाठवून वडाला लागलेल्या आगीची कल्पना दिली.