24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात जुलैपासून सर्वांना मिळणार ५ लाखांपर्यंत विमा?

महाराष्ट्रात जुलैपासून सर्वांना मिळणार ५ लाखांपर्यंत विमा?

मुंबई : महाराष्ट्रात लवकरच सर्व नागरिकांसाठी आरोग्य विम्याचा फायदा घेता येणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. सरकारकडून निर्णय देण्यात आल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल. या विमा योजनेमुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, योजनेद्वारे आतापर्यंत १.५ लाख रुपयांचा विमा दिला जात होता, पण हा विमा वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या लोकांसाठी उपलब्ध होता. त्यामुळे अनेकांना या विम्याचा लाभ घेता येत नव्हता. आता मात्र या विम्याच्या योजनेसाठी उत्पन्नाची मर्यादा असणार नसून सर्वांना याचा लाभ घेता येणार आहे.

या योजनेअंतर्गत सरकार विमा कंपनीला प्रत्येक कुटुंबासाठी १३०० रुपये प्रीमियम भरणार आहे. यासाठी सरकारी तिजोरीतून तीन हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत आणखी ९०० रुग्णालये नव्याने जोडली जाणार असून एकूण १९०० रुग्णालये आता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उपचार देतील. मुंबईत ५७ रुग्णालयांमध्ये एमजेपीजेए योजनेद्वारे उपचार केले जाणार आहेत.

महाराष्ट्रातील जनतेला उत्तम आरोग्यासह चांगल्या सुविधा, तसेच आर्थिकदृष्ट्या परवडण्यासाठी सरकारचे विमा योजना सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. मागील वर्षी जूनमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमा रक्कम दीड लाखावरून ५ लाख रुपये करण्याची घोषणा केली होती. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अधिका-यांनीही ५ लाखांचा विमा लागू करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्याची जवळपास वर्ष होत आले तरीही अंमलबजावणी करण्यात आलेली नव्हती.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी सरकारकडून युनायटेड इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. सध्या दीड लाखाचा विमा ३० जूनपर्यंत असणार आहे. तर १ जुलैपासून ५ लाखांचा विमा लागू करण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी व्यक्तीकडे डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. या दोनपैकी एक कागदपत्र असणे आवश्यक आहे, अन्यथा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

सध्या या योजनेअंतर्गत १००० रुग्णालये आहेत. मात्र आता जुलैपासून आणखी ९०० रुग्णालये जोडली जाणार आहेत. त्यापैकी मुंबईत ५७ रुग्णालयांमध्ये उपचार केले जाणार आहेत. तसेच या विमा योजनेत १३५६ आजार कव्हर होणार आहेत. मूत्रपिंड, यकृत, हृदय आणि इतर अनेक आजारांवर उपचार केले जातील.

कोणत्याही रुग्णाला उपचारासाठी किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्वांत आधी एमजेपीजेएवाय ही विमा योजना असलेल्या रुग्णालयात जावे लागेल. रुग्णालयांसंबधित माहिती https://www.jeevandayee.gov.in  या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या साईटवर नेटवर्क हॉस्पिटल या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर जिल्ह्याची निवड केल्यानंतर रुग्णालयांची संपूर्ण यादी इथे मिळेल.

एखाद्या रुग्णाला डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला असेल, तर डॉक्टर एक फॉर्म आणि पत्र लिहून देतील. तो फॉर्म आणि पत्र रुग्णालयातील ‘रुग्ण मित्र’ इथे द्यावा लागेल. आरोग्य योजनेंतर्गत रुग्णालयांमध्ये एक कक्ष स्थापन केला असून तिथे ‘रुग्ण मित्र’ रुग्णाचे रजिस्ट्रेशन करतो. तिथेच रुग्णाला रेशन कार्ड किंवा डोमिसाईलची झेरॉक्स द्यावी लागते. त्याशिवाय डॉक्टरकडून लिहून दिलेले पत्र जोडावे लागते.

रुग्ण मित्राकडून सर्व कागदपत्रं ऑनलाईन अपलोड केल्यानंतर एमजेपीजेए कार्यालयात असलेली डॉक्टरांची समिती रुग्णाने डॉक्टरद्वारे भरलेल्या फॉर्मची छाननी होते. रुग्णाला खरोखरच उपचाराची गरज आहे, असे समितीला वाटल्यास अवघ्या काही तासांत अर्ज स्वीकारून लाभांतर्गत उपचारासाठी मान्यता दिली जाते.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR