नवी दिल्ली : अभिनय क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केलेल्या खासदार कंगना राणावतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तिस-यांदा विजयी झाल्याबद्दल कौतुक केले. मोदींच्या नेतृत्वामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारली असून, आता आपण तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहोत, असा दावाही कंगना राणावतने केला. लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर कंगनाचे हे लोकसभेतील पहिले भाषण होते.
लोकसभेत अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान कंगना राणावत म्हणाली की, मी या संसदेची नवीन सदस्य आहे, पण मला नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे महत्त्व चांगलेच माहीत आहे. जिथे मोदीजींनी सलग तीन वेळा विजय मिळवून विक्रम मोडला. दहा वर्षांपूर्वी देशाच्या अर्थव्यवस्थेची सर्वांनाच चिंता होती. पण पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे कंगना म्हणाली.