35.9 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात उन्हाचा पारा वाढला!

राज्यात उन्हाचा पारा वाढला!

पुणे : प्रतिनिधी
सध्या राज्यामध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे. मार्चच्या सुरुवातीलाच तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, विदर्भातील नागपूर, अकोला, चंद्रपूर, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांपेक्षा जास्त जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्या कामांसाठीच घराच्या बाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

भारतीय हवामान विभागाने (कटऊ) विदर्भातील काही भागांत ११, १२ आणि १३ मार्च रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. यामध्ये अकोला आणि चंद्रपूर येथे तापमान सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदा तापमान सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांनी अधिक राहील, त्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवेल.

दुस-या बाजूला विदर्भासोबतच मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि नंदुरबार या भागांमध्येही तापमान झपाट्याने वाढले आहे. मुंबईत ३७.२ अंश, ठाण्यात ३८ अंश, कोलाबामध्ये ३६.४ अंश, पुण्यात कोरेगाव पार्क परिसरात ३९.६ अंश, तर नंदुरबारमध्ये ३९.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. या उष्णतेमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता जाणवत आहे. यासह उष्माघात आणि आरोग्याच्या इतर समस्या जाणवण्यास सुरुवात झाली आहे.

तापमानाचा कहर कायम
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे. विशेषत: विदर्भातील काही ठिकाणी तापमान ४२ अंशांपर्यंत पोहोचू शकते. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा सल्ला दिला जात आहे. लहान मुले, वृद्ध आणि आरोग्याच्या समस्या असलेल्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR