मुंबई : प्रतिनिधी
मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयांच्या सुरक्षा व्यवस्थेवर कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आधारित कॅमे-यांचा वॉच असणार आहे. केईएम, सायन, नायर धर्मार्थ रुग्णालय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि कुपर रुग्णालयात हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
प्रसुतीगृह, उपनगरी रुग्णालये आणि विभाग कार्यालये, पालिकेची नाट्यगृह व जलतरण तलाव येथेही अशाच प्रकारचे कॅमेरे विविध टप्प्यांत बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित वास्तूंच्या परिसरात येणा-या व्यक्तींच्या चेह-याची ओळख, तसेच ये-जा करणा-या वाहनांची माहिती या माध्यमातून मिळविणे शक्य होणार आहे. पालिकेच्या सुरक्षा दलाच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व अत्याधुनिक सुरक्षा उपकरणे प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सुरक्षा कर्मचा-यांकरिता ई-मस्टर प्रणालीही लवकरच कार्यान्वित होणार आहे, असे जाधव यांनी सांगितले.
रुग्णालयात अनेकदा निष्काळजीपणाच्या घटना समोर आल्या आहेत. जिथे आरोग्याचा प्रश्न असतो, तिथे तर किमान सर्व यंत्रणा अलर्ट असल्या पाहिजेत. या दृष्टीने मुंबई महापालिकेने पावले उचलली असून, त्याचाच एक भाग म्हणून थेट रुग्णालयांतच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी एआय तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. विशेषत: अनुचित प्रकाराचा धोकाही वाढण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षेला विशेष महत्त्व देण्यात येत आहे.
दरम्यान, मुंबईतील आपत्कालीन घटना प्रभावीपणे हाताळण्यासाठी महापालिकेच्या वतीने कसोसीने प्रयत्न केले जात असून, त्यासाठी कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे काम करीत असताना कर्मचा-यांच्या नेतृत्व गुणांचाही विचार केला जातो. शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करणा-यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या, विशेष कामगिरी बजावलेल्या अधिकारी आणि कर्मचा-यांचा सत्कारही करण्यात आला.
सुरक्षा दलातील कर्मचारी आणि अधिका-यांची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने तसेच नेतृत्व कौशल्य वाढीस लागावे, यासाठी नेतृत्व गुण आणि मार्गदर्शक तत्त्वे या विषयावर प्रसिद्ध लेखक आणि प्रशिक्षक डॉ. राधाकृष्णन पिल्लई यांच्या मुखअय उपस्थितीत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले, असेही सांगण्यात आले.
आपत्कालीन घटनांवर
नियंत्रण आणणार
आपत्कालीन घटना प्रभावीपणे हाताळण्याच्या दृष्टीने सर्व सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा रक्षक यांना आपत्कालीन व्यवस्थापन विषयक १२ दिवसांचे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने दिले जात आहे. सुरक्षा अधिका-यांसह एकूण ३८४ सुरक्षा रक्षकांना आतापर्यंत एकूण १० तुकड्यांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांना पावसाळ््यात मुंबईतील ६ महत्त्वाच्या समुद्र चौपाट्यांवर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येते, असे सांगण्यात आले.