लातूर : प्रतिनिधी
महारा्ट्र-कर्नाटक या दोन राज्याला जोडणा-या लातूर-जहीराबाद महामार्गाचे काम निकृष्ट झाले आहे. त्याची चौकशी करावी, या महामार्गावर पडलेल्या भेगा त्वरीत दुरुस्त कराव्यात, महामार्ग बांधतांना पाण्याचा निचरा होणा-या व्यवस्था उभाराव्यात. त्याचबरोबर महामार्गावर उभारण्यात आलेली प्रकाश व्यवस्था नियमीत सुरु राहण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या चर्चेत केली आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान बुधवारी सकाळी प्रश्नोत्तराच्या तासात राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भाने चर्चा सुरु असतांना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, रा्ष्ट्रीय महामार्ग बांधत असतांना आजूबाजूचा पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था उभारल्या जात नसल्यामुळे अनेक ठिकाणी समस्या निर्माण झाल्या आहेत. लातूर शहराच्या बाजूनी महामार्ग गेले असल्याने या ठिकाणी पाण्याच्या निच-याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्याच बरोबर राष्ट्रीय महामार्ग बांधतांना तो शहर किंवा गावामधून जातो तेव्हा तेथे प्रकाश व्यवस्था उभारली जाते मात्र ही प्रकाश व्यवस्था नियमीत सुरु राहत नाही. त्यामुळे अपघात व इतर समस्या निर्माण होतात.
या संदर्भात राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्र्यांनी केंद्रिय यंत्रणेसोबत समन्वय सांधून धोरणात्मक निर्णयाव्दारे या समस्या दूर करणे आवश्यक आहे. केंद्रिय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाबद्दल कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. मात्र राज्यात राष्ट्रीय महामार्ग बांधतांना त्याच्या गुणवत्तेबाबत तक्रारी येत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. यातील महाराष्ट-कर्नाटक या दोन राज्याला जोडणा-या लातूर-जाहीराबाद महामार्गाचे काम निकृष्ट झाले आह. हे स्पष्टपणाने जाणवत आहे. रस्त्यावर मोठमोठया भेगा पडल्याने दररोज अपघात घडत आहेत. या संदर्भात नुकतेच आंदोलनही झाले आहे. त्यासंदर्भात चौकशी होणे आवश्यक आहे.
लातुरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी तेथे भेट घेऊन पाहणीही केली आहे. त्यांच्या पातळीवर ते या संदर्भात पाठपूरावा करतील परंतू राज्यातील राष्ट्रीय महामार्गचे काम दर्जेदार होण्याच्या दृष्टीने राज्याच्या सार्वजनीक बांधकाम विभागाने लक्ष देण्याचे गरजेचे असल्याचे आमदार देशमुख यांनी यावेळी म्हटले आहे.