मुंबई : सर्व्हेच्या नावाखाली भाजपाने आम्हाला उमेदवार बदलायला लावले. अनेक जागा स्वत:कडे घेतल्या. पण भाजपचेही उमेदवार पडले. हे उद्योग केले नसते, वेळेत जागावाटप करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यावर सगळ्या निवडणुकीची जबाबदारी टाकली असती तर महायुतीचे आणखी खासदार निवडून आले असते, असा दावा करत शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आज भाजपावर निशाणा साधला. विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला किमान १०० जागा मिळायला हव्या नाही तर सर्वच जागा आमच्या, असा सूचक इशाराही त्यांनी भाजपला दिला.
शिवसेनेच्या ५८ व्या वर्धानपदिनाच्या कार्यक्रमात बोलताना कदम यांनी भाजपावर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीत घेण्याचा निर्णयावर थेट टीका केली होती. भाजपच्या हट्टामुळे शिंदे गटाचे अनेक उमेदवार निवडून आले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला होता. आज त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना, आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला १०० जागा मिळाव्यात अशी मागणी केली. गेल्यावेळी आमचे १८ खासदार होते. पण लोकसभेत आम्हाला १५ जागा देण्यात आल्या. १५ जागा मिळूनही जर का उमेदवार भाजपप्रमाणेच वेळेवर जाहीर केले असते, तर आमचे १३ ते १४ खासदार निवडून आले असते. पण अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला लटकवण्यात आले. ठाणे, कल्याण, नाशिक जागेवर भाजपनेच दावा ठोकला होता . मुख्यमंर्त्यांचा लेक निवडून येणार नाही, असे सांगितले. पाच वेळा निवडून आलेल्या भावना गवळींचे तिकीट कापायला लावले. ंिहगोलीचा जाहीर झालेला उमेदवार बदलण्यास भाग पाडले. भाजपने आमचे आम्हाला बघू द्यायला हवे होते, असे कदम यांनी सुनावले.
आता आम्ही विधानसभेच्या जागावाटपात १०० जागा मागितल्या आहेत. त्यातल्या आम्ही ९० जागा ंिजकू. ही आमची विनंतीवजा मागणी आहे. माझ्या नावात भाई असले तरी मी विनंती करत आहे. आम्ही भाऊ म्हणून तुमच्याकडे विश्वासाने आलो. अजितदादांना जरा उशिरा घेतलं असतं तर त्यांच्या वाट्याला गेलेली ९ मंत्रिपदं शिवसेनेला मिळाली असती आणि मुख्यमंर्त्यांनी ज्यांना शब्द दिला होता त्यांना जॅकेट घालून बसावं लागलं नसतं,असेही रामदास कदम यांनी सुनावले. जागावाटपावेळी जे झालं ते अतिशय घृणास्पद होतं. रायगड आमचं, रत्नागिरी आमचं, अमरावतीही आमचीच असं भाजपने केलं. अतिशय विश्वासाने आम्ही भाजपसोबत गेलो होतो. जर एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी दिली असती तर महायुतीच्या आणखी जागा वाढल्या असत्या. लोकसभेत पराभव का झाला याचं विश्लेषण तीनही पक्षांनी करावं, असा सल्ला रामदास कदम यांनी दिला.