24.5 C
Latur
Monday, September 23, 2024
Homeमुख्य बातम्याविद्यार्थ्यांनो आवडीच्या क्षेत्रात करिअर करा!

विद्यार्थ्यांनो आवडीच्या क्षेत्रात करिअर करा!

राज्यपाल राधाकृष्णन यांचे आवाहन : ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा ७ वा दीक्षांत समारंभ उत्साहात

पुणे : प्रतिनिधी
विद्यार्थी हा उद्याच्या विकसित भारताचा प्रमुख कणा आहे. भारताच्या या युवा पिढीने कधीही हताश न होता, आवडीच्या क्षेत्रात यशस्विरित्या करिअर करावे. आपले काम, प्रतिभा व तत्वांवर ठाम राहून कष्ट केल्यास कुठल्याही क्षेत्रात यश नक्कीच मिळते, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी मांडले.
ते एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्­नॉलॉजी विद्यापीठाच्या ७ व्या दिक्षांत समारंभ प्रसंगी बोलत होते.

या प्रसंगी माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, प्रतिष्ठित शास्त्रज्ञ इस्रो तथा यु.आर.राव उपकेंद्र, बंगळुरूचे संचालक डॉ. एम. शंकरन, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा.डॉ.सुनिता कराड, सौ.ज्योती ढाकणे-कराड, डॉ.विनायक घैसास, डॉ.सुचित्रा नागरे, प्र.कुलगुरू डॉ.रामचंद्र पुजेरी, डॉ.अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ.महेश चोपडे, परीक्षा नियंत्रक डॉ.ज्ञानदेव नीलवर्ण आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल राधाकृष्णन पुढे म्हणाले, अध्यात्माचा संबंध हा प्रत्येकाच्या जिवनाशी व जिवनातील प्रत्येक गोष्टीशी असतो. आर्थिक प्रगतीसाठी मानवाची सांस्कृतीक प्रगतीही तितकीच महत्त्वाची असते. असेच मुल्याधिष्ठीत व संस्कृतीची जाण असणारे विद्यार्थी घडविण्याचे काम एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या माध्यमातून घडत आहे, असे म्हणत राज्यपालांनी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या पाठीवर कौतुकाची थापही टाकली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना, प्रा.डॉ.मंगेश कराड यांनी विद्यापीठाने वर्षभरात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीचा अहवाल मांडला.

विद्यार्थ्याच्या यशात संस्थेचा वाटा महत्वाचा : एम.शंकरन म्हणाले, आपण कुठल्याही क्षेत्रात कमी नाही, हे भारताने नुकतेच जगाला दाखवून दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीचा स्वाभिमान बाळगून देशाचे नाव वाढविण्यासाठी प्रयत्नशिल राहिले पाहिजे. विद्यार्थी केवळ स्वत: कष्टाने जीवनात यशस्वी होत नाही. तर त्याच्या यशामागे, संस्थेसह अनेकांचा हातभार लागलेला असतो. त्यामुळे आता पदवी घेवून समाजात प्रवेश करत असताना आपणही समाजाचे काहीतरी देणं लागतो, याचे कायम भान ठेवा, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला.

२९७२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व विश्वशांती प्रार्थनेद्वारे सुरू झालेल्या या कार्यक्रमात विद्यापीठातील २२ पीएचडी, ५३ सुवर्णपदके व १९४ विद्यार्थ्यांना रँक होल्डर प्रमाणपत्र यांसह एकूण २९७२ विद्यार्थ्यांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पदवी बहाल करण्यात आली. पसायदानाने सांगता झालेल्या या कार्यक्रमाचे आभार डॉ.पुजेरी यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा.स्रेहा वाघटकर व प्रा.स्वप्निल शिरसाठ यांनी केले.

विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीत
वाटा उचलावा : डॉ. कराड
एमआयटी एडीटीने एक चांगला विद्यार्थी घडविण्यासोबतच एक मुल्याधिष्ठीत मनुष्य जो अध्यात्म व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नशिल असतो, असे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. या दीक्षांत समारंभाच्या माध्यमातून आज पदवी मिळविणा-या सर्व विद्यार्थ्यांनीही भारताच्या उज्वल भविष्यात आपला अनमोल वाटा द्यावा, असे मी त्यांना आवाहन करतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR