लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रा राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांच्या ८० जयंतीनिमित्त सोमवार दि. २६ मे रोजी सकाळी ९ वाजता बाभळगाव येथील विलासबाग येथे सार्वजनिक आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री म्हणून आदरणीय विलासरावजी देशमुख यांना लोककल्याणाची विचारवाहिनी म्हणून आपण सर्वजण ओळखतो. त्यांनी आपल्या कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व गुणांच्या जोरावर भारतीय राजकारणात एक विशेष स्थान निर्माण केले. सार्वजनीक जीवनात बाभळगावचे सरपंच ते राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असा यशस्वी राजकीय प्रवास केला. सामान्य जनतेच्या प्रती आपुलकी आणि लोककल्याणकारी कामात धडाडी यामुळे त्यांना मोठी लोकप्रीयता लाभली. संघटन कौशल्य लोकांचे पाठबळ यांमुळे ते नेहमी निर्णायक भुमीकेत राहीले. मिळालेल्या संधीच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, कृषी, सहकार, आर्थिक आदी क्षेत्रात भरीव कार्य केले. जलसंधारण, बॅरेज बांधणी आदी अभिनव प्रयोग करुन राज्यातील सिंचन क्षेत्र वाढवले. साखर कारखानदारी तसेच तेल, दाळ आदी कृषीपुरक उदयोगाला चालना देऊन ग्रामीण भागात आर्थिक क्रांती घडवली. शहरातील दळवळण आणि उदयोग उभारणीला गती देऊन विकास प्रक्रीयेत समातोल साधला. त्यामुळे लोकमानसात त्याच्या कार्यकतृत्वाचा प्रभाव कायम आहे.
अशा कतृत्व संपन्न नेतृत्वाच्या ८० व्या जयंतीनिमित्त सोमवार दि. २६ मे रोजी बाभळगाव येथील विलासबाग येथे आयोजित या कार्यक्रमातून त्यांच्या कार्याला स्मरणपूर्वक आदरांजली वाहण्यात येणार आहे. या सभेसाठी सकाळी सर्वांनी ८.४५ वाजता विलासबाग येथे स्थानापन्न व्हावे, अशी अपेक्षा आहे. सकाळी ९ वाजता सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक भारतरत्न भीमसेन जोशी यांचे शिष्य किराणा घराण्यातील गायक आणि बालगंधर्व या चित्रपटाचे पार्श्वगायक आनंद भाटे व त्यांच्या सहका-यांकडून, तीर्थ विठ्ठल, माझे माहेर पंढरी, इंद्रायणी काठी, चिन्मया सकल हृदया या गीतांसह शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून भावस्वरांजली हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे, उपस्थित सर्वांनी पुष्पांजली अर्पण केल्यानंतर १० वाजता आदरांजली सभेचा समारोप होईल. या सभेचे सुत्रसंचालन बाळकृ्ष्ण धायगुडे व सचिन सुर्यवंशी करणार आहेत. या आदरांजली कार्यक्रमास विलासबाग, बाभळगाव येथे जनतेने आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन देशमुख कुटूंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.