लातूर : प्रतिनिधी
मानसीकदृष्ट्या कणखर असलेला शेतकरी आज नैसर्गीक संकट आणि लालफितीच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे खचत चालला आहे. त्यातूनच आत्महत्येसारख्या घटना वाढत चालल्या आहेत. अशा परस्थितीत शेतक-यांचे मानसीक सशक्तीकरण काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या संचालिका राज योगिनी ब्रह्माकुमारी नंदादीदी यांनी ‘शाश्वत यौगिक खेती एवं किसानों का मानसिक सशक्तिकरण’ आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात केला होता. त्या प्रसंगी प्रमुख पाहूण्या म्हणून चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणुन राजस्थानमधील माऊंट अबु येथील राजयोग एज्युकेशन व रिसर्च फाऊंडेशनचे कृषी आणि ग्रामविकासचे सचिव ब्रह्मकुमार डॉ. राजू भाईजी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. व्ही. लाडके, आत्मा प्रकल्पाचे उपसंचालक मनिषा बांगर, कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कृषीभूषण डॉ. भगवान इंगोले, व्हीडीएफ फाऊंडेशनच्या समन्वयिका संगीता मोळवणे, प्रितम जाधव यांची उपस्थिती होती. महिला सशक्तिकरणाचे उपक्रम सातत्याने होतात.
परंतु, शेतक-यांचे मानसीक सशक्तिकरण हा नाविण्यापूर्ण उपक्रम आहे, असे नमुद करुन चेअरमन श्रीमती वैशालीताई देशमुख पुढे म्हणाल्या की, मानसिक रित्या खचल्यामुळे ब-याच शेतक-यांना आत्महत्या हा पर्याय योग्य वाटत आहे. कुठेतरी शेतकरी मानसिकरित्या खचला जात आहे. शेतक-याला बळ देण्यासाठी या प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन वेळोवेळी होणं गरजेचे आहे. यावेळी बोलताना ब्रह्माकुमार डॉ. राजू भाईजी यांनी शाश्वत यौगिक शेती आणि शेतक-यांचं मानसिक सशक्तिकरण या विषयावरती सविस्तर मार्गदर्शन दिले. योगिक शेती कशा पद्धतीने होऊ शकते त्याचे होणारे फायदे या सर्व विषयावरती सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमास सर्व राजयोगिनी
ब्रह्मकुमारी बहनजी व भाईजी यांची उपस्थिती होती.

