मुंबई : सरदेसाई वाड्याचे स्मारकात रूपांतर करावे, अशी मागणी आज विधान परिषदेत करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराजांना साजेसे असे स्मारक उभारू, अशी घोषणा केली.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांना मुघल सम्राट औरंगजेबाच्या सैन्याने सरदेसाई वाड्यातून पकडले होते. हे स्थळ संभाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या शौर्य आणि बलिदानाची एक मार्मिक आठवण करून देते. ‘छावा’ चित्रपटात सरदेसाई वाडा दाखवण्यात आला होता. यानंतर या स्थळाला भेट देण्यासाठी इतिहासप्रेमी आणि पर्यटकांकडून गर्दी होताना दिसत आहे. मात्र सरदेसाई वाड्याची सध्या दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सरदेसाई वाड्याचे स्मारकात रूपांतर करावे, अशी मागणी आज विधान परिषेदत करण्यात आली.
संगमेश्वरातील सरदेसाई वाडा हे छत्रपती संभाजी महाराजांचे शेवटचे वास्तव्य असलेले ठिकाण आहे. ‘छावा’ चित्रपटानंतर सरदेसाई वाडा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संगमेश्वरातील सरदेसाई वाडा अधिग्रहित करून तिथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारले जाईल. छत्रपती संभाजी महाराजांना साजेसे असे स्मारक उभारू, अशी घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे पाचाडला शिवसृष्टी उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच संभाजी महाराजांना साजेसे स्मारक बांधण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल, असेही फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे शौर्याचे प्रतीक आहेत. छत्रपती संभाजी महाराज हे शौर्यवीर, धर्मवीर आणि स्वराज रक्षक आहेत. ‘‘देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा…. महापराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था’ अशा ओळीही फडणवीसांनी सभागृहात म्हटल्या. यानंतर त्यांनी कर्नाटकातील शहाजी राजांच्या स्मारकाची स्थिती योग्य नाही. त्यामुळे आम्ही कर्नाटक सरकारशी बोलू आणि जर त्यांनी काम करण्यास नकार दिला तर शहाजी राजेंच्या स्मारकाचा विकास करण्याबाबत भूमिका मांडू, अशी माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मांडली आहे.