नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सासू आणि सास-यांनी सुनेला टोमणे मारणे हा कौटुंबिक जीवनाचा एक भाग आहे. याला क्रूरता म्हणता येणार नाही. विशेषत: लग्नाच्या अनेक वर्षांनंतर जेव्हा दोन्हींपैकी एक बाजूने घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा अशा प्रकारचे आरोप होतात. याकडे पाहताना न्यायालयाने सावधगिरी बाळगली पाहिजे, असे निरीक्षण नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.
या सासू आणि सास-यांवर भारतीय दंड संहिता कलम ४९८ अ (पती व त्याच्या कुटुंबियांनी केलेली क्रूरता) अंतर्गत दाखल केलेली तक्रार फेटाळून लावत गुन्हेगारी कारवाई रद्द केली.
‘बार अँड बेंच’ने दिलेल्या वृत्तानुसार, दाम्पत्याचे २००५ मध्ये लग्न झाले. पतीने मे २०१९ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी समन्स मिळाल्यानंतर तीन दिवसांनी पत्नीने पतीसह सासू आणि सास-यांवर शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप केला. या प्रकरणी पतीसह सासू आणि सास-यांवर भारतीय दंड संहिता कलम ४९८अ (पती व त्याच्या कुटुंबियांनी केलेली क्रूरता) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कायदेशीर कारवाई रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका पतीने गुजरात उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळली. अखेर पतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
पतीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती मनमोहन आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने स्पष्ट केले की, सासू आणि सास-यांनी सुनेला टोमणे मारणे हा कौटुंबिक जीवनाचा एक भाग आहे. याला क्रूरता म्हणता येणार नाही. विशेषत: वैवाहिक वादांशी संबंधित प्रकरणांमध्ये, विशेषत: लग्नाच्या अनेक वर्षांनंतर जेव्हा एक पक्ष दुस-या पक्षाविरुद्ध घटस्फोटाची प्रक्रिया सुरू करतो तेव्हा आरोप केले जातात. जिथे द्वेषाचे आरोप आहेत, तिथे संबंधित न्यायालयाने आरोपांमागील हेतू काय आहे? याची चौकशी करावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.