28.5 C
Latur
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रअंबाजोगाई-लातूर महामार्गावर भीषण अपघात; कंटेनरने कारला उडविले, ४ ठार

अंबाजोगाई-लातूर महामार्गावर भीषण अपघात; कंटेनरने कारला उडविले, ४ ठार

चाकूर : प्रतिनिधी
अंबाजोगाई-लातूर महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले आहेत. मुसळधार पावसात अंदाज न आल्याने कार- आणि कंटेनरची धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चुराडा झाला असून कारमधील सर्व व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बीडच्या अंबाजोगाई -लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ आज पहाटे (रविवार, २२ सप्टेंबर) स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट कार मधील चौघेही जागीच ठार झाले आहेत. सर्व मृत व्यक्ती लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगळपूर येथील आहेत.

रात्री उशीरा जगळपूर येथील चार जण स्विफ्ट कारमधून (एमएच -२४ एएस -६३३४ )औरंगाबादला निघाले होते. रात्री सुरू असलेल्या मुसळधार पावसात अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्गा जवळ त्यांच्या कारची आणि समोरून येणा-या कंटेनरची (एमएच -१२ एमव्ही-७१८८ ) जोरदार धडक झाली. हा अपघात मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास झाला. यावेळी कार कंटेनरच्या खाली घुसल्याने कारचा चुराडा झाला आणि आतील चौघांचा जागीच मृत्यू झाला.

सर्व मृतदेह अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. अपघाताच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू होता, त्यामुळे चालकांना समोरून येणा-या वाहनाचा अंदाज न आल्याने अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मयतामध्ये चाकूर तालूक्यातील जगळपुरचे माजी सरपंच माधवराव व्यंकटराव खलंग्रे (वय ५८),आत्माराम माधवराव बाणापुरे वय (५४ ),सौदागर केशव कांबळे (वय ५०),चालक शिवराज शंकरराव डोम (वय ५१) रा. लातूर यांचा समावेश आहे.अपघाताची माहीती मिळताच बर्दापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाणे,यादव, बिडगर यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह अंबाजोगाई येथील शासकिय रूग्णालयात पोस्टमार्टन साठी दाखल केले आहेत.

जगळपुरात आक्रोश
जगळपुरात अपघाताचे वृत्त कळताच दु:खाचा डोंगर कोसळला असुन बानापुरे,खलंग्रे,कांबळे परिवार महिलांचा आक्रोश सुरू झाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR