मुंबई : प्रतिनिधी
बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिलेला आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर हे सरकार बरखास्त झाले पाहिजे अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारल्याची बातमी आली आहे. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की, फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही. हे सरकार बरखास्त झालं पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती आपण पाहत आहोत. कुठे लहान मुलींवर, महिलांवर बसमध्ये बलात्कार होत आहे. त्यावर गृहराज्यमंत्री म्हणतात हे शांततेत झालं म्हणून आम्ही काही करू शकत नाही.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी दबाव वाढवला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे.
सर्वांनीच भयंकर वर्णन केले
डिसेंबरपासून हा विषय सुरू आहे. आम्ही हीच मागणी करत होतो की, पारदर्शक चौकशीसाठी आका म्हणून ज्यांचं नाव येत आहे त्या धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. आम्हीच नाही तर भाजपाचेच आमदार राजीनाम्याची मागणी करत होते. भाषणं झाली, प्रत्येकाने भाषणं दिली. सर्वांनीच भयंकर वर्णन केले आहे. हे सर्व झाल्यावर आम्हाला वाटले होते की मुख्यमंत्री कुठेतरी ऐकून घेतील आणि न्याय देतील.