बीड : प्रतिनिधी
अवकाळी पाऊस आणि वादळी वा-यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या कांदा निर्यातीवर सरकारकडून कुठलेही बंधन नाही. तरीही कांद्याची निर्यात संथ गतीने होत आहे. भारतातून सर्वांत जास्त कांदा निर्यात होणा-या बांगलादेशात सध्या स्थानिक कांद्याची विक्री सुरू असल्याने तिथे भारतीय कांद्याची मागणी कमी झाली आहे. कांद्याला येणा-या काळात चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने शेतक-यांनी आपला कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला आहे. परंतु अवकाळी पावसामुळे चाळीतील कांदा भिजल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कांद्याच्या साठवणुकीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतक-यांना हा कांदा मिळेल त्या भावात विकावा लागणार आहे, परिणामी शेतक-यांना अवकाळी पावसाचा आर्थिक फटका बसला असून, तोंडचा घास हिरावला आहे.
कमी बाजारभावामुळे शेतक-यांनी कांदा साठवून ठेवला : बीड जिल्ह्यात कांद्याची लागवड झाली होती. या हंगामात शेतक-यांना चांगले उत्पादन मिळाले होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात देखील कांद्याला चांगला भाव मिळेल, या आशेने कांदा उत्पादक शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली होती. सध्या बहुतांश शेतक-यांनी कांदा काढणी पूर्ण केली आहे. परंतु कमी बाजारभावामुळे शेतक-यांनी कांदा साठवून ठेवला आहे. त्यातच अवकाळी पावसाचा फटका कांद्याला बसत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. केंद्र सरकारने बफर स्टॉकसाठी नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत प्रत्येकी दीड लाख टन म्हणजे एकूण तीन लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे, मात्र, ही खरेदी अद्याप सुरू न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
बीडचा शेतकरीही अवकाळी पावसाने हवालदिल झाला आहे. मी साडेतीन एकर कांद्याची लागवड केली होती. जवळपास रोपं, बी-बियाणे, खतं, फवारणी आदी २ लाख रुपयांच्या वर खर्च झाला आहे. अवकाळी पावसाने काही कांदा शेतातच सडला तर काही काढून झाकून ठेवला होता, परंतु अवकाळी पावसामुळे कांदा पाण्याखाली गेला आणि तो काळपट पडला आहे, तर काही कांद्याला कोंब फुटले आहेत. सध्या चांगल्या कांद्याला १५ रुपये किलोपर्यंत भाव आहे. आधीच कांद्याला भाव नाही आणि आता दुष्काळात तेरावा महिना म्हटल्याप्रमाणे अवकाळी पाऊस झाला. आम्ही जगायचं कसं? असा सवाल शेतकरी कल्याण वाणी यांनी उपस्थित केला आहे.