लातूर : प्रतिनिधी
जिल्हाभरात उन्हाची तीव्रता वाढल्याने शहरातील बाजारात रसाळ फळांची मागणीही वाढली आहे. बाजारात टरबूज, खरबूज, आंबे, संत्री, अननस आदी फळांची चांगली आवक होत आहे. मात्र, आवक वाढूनही मागणीमुळे दर मात्र वाढले आहेत. शहरात काही प्रमाणात आंब्यांचा आवक वाढली आहे. बाजारपेठेत सध्या फळांची आवक होण्यास सरुवात झाली आहे. रमजानमुळे काही दिवसात फळांची आवक वाढेल त्यानंतर पंधरा दिवसात दर कमी होतील, असे फळ व्यापारी यांनी एकमतशी बोलतानो सांगितले.
सध्या शहरात तापमानाचा पारा ३५ अंशांपलिकडे गेला आहे. यामुळे उसाच्या रसाबरोबरच विविध फळांच्या ज्युसलाही मागणी वाढली आहे. यामुळे रसाळ फळांची मागणी वाढली आहे. त्या तुलनते चिकू, पपई, सफरचंद, केळी या फळांनाही चागली मागणी आहे. हाफूस, लालबाग, देवगोडा आदी जातीचे आंबे बाजारात दाखल झाली आहेत. किरकोळ बाजारात लालबाग व देवगोडा १०० रुपये तर हाफूस २०० रुपये किलोने मिळत आहे. सफरचंद, चिकू यांचे दर स्थिर आहेत. संत्री, अननस, टरबूज, खरबुजांची नगाप्रमाणे विक्री होत आहे. अननस ३० ते ६० रुपये तर टरबूज २० ते ७० रुपये नगाने मिळत आहे.
द्राक्ष निर्यातीवर भर यंदा हवामान अनुकूल असल्याने विक्रमी द्राक्ष निर्यात झाली आहे. यामुळे किरकोळ बाजारात द्राक्षांची फारशी रेलचेल नाही. किरकोळ बाजारात द्राक्ष ४० ते ५० रुपये किलोने मिळत आहेत. गतवर्षी गारपीटमुळे स्थानिक बाजारपेठेत द्राक्षांची विक्रमी आवक झाली होती. यंदा मात्र स्थानिक बाजारपेठेत आवक कमी झाली आहे. शहरातील बाजारपेठेत फळांचे दर किलोमध्ये हाफूस आंबे २०० रुपये, लालबाग १०० रुपये, देवगोडा १०० रुपये, द्राक्ष ४० ते ५० रुपये, टरबूज २० ते ७० रुपये, डाळिंब ४० ते ७० रुपये, पपई ४० रुपये चिकू ४० ते ५० रुपये संत्री ३० ते ६० रुपये सफरचंद ८० ते १०० रुपये, नारळ पाणी ३० रुपयाला एक नग केळी ५० ते ६० रुपये डझन या दराने किरकोळ बाजारात विक्री केली जात आहे.