कळंब : सतीश टोणगे…..
लोकसभेचा निकाल जवळ येऊ लागल्याने सर्वजणच अंदाज बांधू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होतील, यावर सर्वांचे शिक्कामोर्तब झाले असले, तरी एक्झिट पोलने मात्र धुमाकूळ घातला आहे. नेमका अंदाज कसा बांधला जातो, कोणाला विचारले जाते, विजयाची खात्री हे सर्व्हे करणारे कसे काय देतात..? याची कुजबूज होऊ लागली आहे. ग्रामीण भागातील अशिक्षित मंडळी मात्र, ‘एक्झिट पोल म्हणजे काय रे भाऊ? ’असा प्रश्न विचारू लागले आहेत.
अठरावी लोकसभा अस्तित्वात यायला काही तासांचा अवधी आहे. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे राहुल गांधी यांनी आव्हान उभे केले आहे. मोदी यांच्यासोबत तगडी फौज असून, राहुल गांधी मात्र तोकड्या शिलेदारांसह मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्रात पण तशीच परिस्थिती आहे. नेते विरुद्ध सर्वसामान्य मतदार अशी लढत होत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात भाजपाला जास्त फटका बसेल असे एक्झिट पोलचे म्हणणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ४०० पारचे स्वप्न महाराष्ट्र पूर्ण होऊ देणार नसल्याची चर्चा रंगू लागली आहे. काहीही असो या निवडणुकीत सर्वच मतदारसंघांत चुरशीच्या लढती झाल्या. गेली दहा वर्षे मोदीभक्त झालेले मतदार या निवडणुकीत विरोधात होते हे मात्र नक्की.
महाराष्ट्रात जर भाजपाची पीछेहाट झाली तर नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. राज्यातील महिलांनी गेल्या दोन निवडणुकांत मोदीला पसंती दिली होती,परंतु घरगुती गॅसने चारशे पार करून आज घडीला हजार रुपयांपर्यंत मजल मारली यामुळे किचन बजेट कोलमडले त्यामुळे मोदींचे नावही सर्वसामान्य महिला आता काढून देत नाहीत. मंदिरे बांधून पोट भरत नाहीत, त्यासाठी हाताला कामच लागते व ते काम देण्यास मोदी असमर्थ ठरले असल्याची चर्चा होऊ लागल्याने या एक्झिट पोलची ‘पोलखोल’ होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
मराठवाड्यातील वात्रटिकाकार सूर्यकांत डोळस यांनी एक्झिट पोलवाले जसे वागतात तसेच कार्यकर्तेही वागू लागले, प्रत्येक निकालाच्या अगोदर विजयाचे बॅनर लागू लागले, असा शालजोडा आपल्या कवितेमधून मारला आहे.