औसा : प्रतिनिधी
औसा तालुक्यातील गोंद्री गावातील शेतकरी शुक्राचार्य विठ्ठल भोसले यांच्या केळी बागेचे वादळामुळे अतोनात नुकसान झाले असून (दि.२९) रोजी आमदार अभिमन्यू पवार यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त बागेची पाहणी केली. पंचनाम्याच्या कार्यवाहीसंदर्भात अगोदरच प्रशासनाला फोनवर सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे केले आहेत. अन्य फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.
२६ मे रोजी अचानकपणे सुरु झालेल्या वादळी वार्Þयाने पुन्हा एकदा औसा तालुक्यातील आंबा , केळी व मोसंबी फळबागांचे नुकसान केले आहे. गेल्या दीड दोन महिन्यापासून औसा तालुक्यात कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस आणि वादळी वारा सुरु आहे. या अवकाळीमुळे यापूर्वीच फळबागांचे नुकसान झाले आहे .उर्वरीत फळबागांचे रविवारी झालेल्या वादळी तडाक्यात नुकसान झाले आहे. या वादळी वार्Þयात तालुक्यातील महसुली आठ मंडळात कृषी विभागाचे चार मंडळ असून या चार पैकी औसा ,बेलकुंड व लामजना या तीन मंडळातील धानोरा, गोंद्री , करजगाव , गुळखेडा व परिसरातील आंबा , केळी व मोसंबी पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सदरील नुकसानीची माहिती मिळताच आमदार अभिमन्यू पवार यांनी कृषी विभागास सदरील नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्या फळबागांची पाहणी आपत्ती निवारण ग्रामस्तरीय
समितीने सोमवार दि .२७ रोजी केली आहे. बुधवारी आमदार अभिमन्यू पवार यांनी गोंद्री गावातील शेतकरी शुक्राचार्य विठ्ठल भोसले यांच्या केळीच्या बागेचे वादळामुळे अतोनात नुकसान झाल्याची पाहाणी केली असून नुकसानग्रस्त शेतक-याना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.