24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयकाँग्रेस नेते राहुल गांधी सरकारवर संतापले

काँग्रेस नेते राहुल गांधी सरकारवर संतापले

शेतक-यांना संसदेच्या गेटवर रोखल्याने झाला प्रचंड गदारोळ

नवी दिल्ली : आज संसदेबाहेर प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शेतकरी नेत्यांना संसदेतील त्यांच्या कार्यालयात भेटण्यासाठी बोलावले होते. मात्र, शेतकरी नेते संसदेत पोहोचल्यावर त्यांना गेटवरच रोखण्यात आले.

शेतक-यांना प्रवेश न दिल्याने विरोधी पक्षनेते राहुल गांधी चांगलेच संतापले. आम्ही शेतक-यांना भेटण्यासाठी बोलावले असताना ते त्यांना संसदेत येऊ देत नाहीत. कारण ते शेतकरी आहेत, याच कारणामुळे त्यांना रोखण्यात आले असा आरोप राहुल गांधींनी केल्यानंतर शेतक-यांना संसदेत प्रवेश देण्यात आला आणि त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली.

संसद परिसरातील प्रचंड विरोधानंतर राहुल गांधींच्या मध्यस्थीमुळे किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील १२ शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाने राहुल गांधी यांची भेट घेतली. या बैठकीला काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल, अमरिंदर सिंग राजा वारिंग, सुखजिंदर सिंग रंधवा, गुरजित सिंग औजला, धरमवीर गांधी, डॉ. अमर सिंग, दीपेंद्र सिंग हुडा आणि जय प्रकाश हे देखील उपस्थित होते. या बैठकीत शेतकरी संघटनांनी शेतक-यांच्या मागणीसाठी सरकारवर दबाव टाकण्याची आणि प्रायव्हेट मेंबर बिल मांडण्याची मागणी केली.

सरकारवर दबाव आणणार – राहुल गांधी

दरम्यान, शेतकरी नेत्यांची भेट घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, आम्ही आमच्या जाहीरनाम्यात कायदेशीर हमीसह एमएसपीचा उल्लेख केला आहे. यासोबतच आम्ही या मुद्याचे मूल्यांकन केले आहे. त्यानुसार, एमएसपी लागू केले जाऊ शकते. आम्ही नुकतीच एक बैठक घेतली ज्यामध्ये आम्ही विरोधी आघाडीच्या इतर नेत्यांशी चर्चा करून देशातील शेतक-यांना एमएसपीची कायदेशीर हमी देण्यासाठी सरकारवर दबाव आणू असे ठरले आहे, असे राहुल गांधींनी सांगितले.

शेतकरी १५ ऑगस्ट रोजी काढणार देशभरात ट्रॅक्टर रॅली

२२ जुलै रोजी संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाने देशभर मोदी सरकारचे पुतळे जाळणार असल्याचे सांगितले होते. हमीभाव कायदेशीर करणे, कर्जमाफी, पीक विमा, शेतकरी आणि शेतमजुरांची पेन्शन, वीज खाजगीकरण मागे घेणे आणि इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकरी नवीन आंदोलने सुरू करतील, असेही शेतक-यांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे केंद्र सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR