लातूर : प्रतिनिधी
लातूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले महाविकास आघाडी, काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांचे मन:पुर्वक अभिनंदन. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी, समाजवादी पार्टी व इतर मित्रपक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परीश्रमाचा हा विजय असून या सर्वांचे तसेच मतदार संघातील जनतेचे मन:पुर्वक आभार मानत असल्याची प्रतिक्रीया माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
लोकसभा निकालावर प्रतिक्रीया व्यक्त करताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे की, लातूर सह मराठवाडा, महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील जनतेने निर्भय बनून महाविकास आघाडीस (इंडिया आघाडी) पाठींबा दिल्यामुळे ऐतिहासिक विजय मिळाला आहे. या विजयासाठी काँग्रेस पक्षाच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी, अ.भा.काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी प्रचंड परीश्रम घेतले आहेत. या सर्वांचे मन:पुर्वक आभार.
महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी, समाजवादी पार्टी व इतर पक्षाच्या अनेक नेत्यांनी अथक परिश्रम घेऊन राज्यात महाविकास आघाडीला मोठा विजय मिळवून दिला आहे.
त्याबद्दलही सर्व नेत्यांसह महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे अभिनंदन व आभार या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत एकदिलाने काम केले. त्यासोबतच वाढलेली महागाई व बेरोजगारी तसेच शेती मालाचे पडलेले भाव हे मुद्दे चर्चेत आणून महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी जनतेला आपल्या बाजुने वळवण्यात यश मिळवले. त्यामुळे महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. असे सांगुन आगामी काळातही महाविकास आघाडी अशाच पद्धतीने एकजुट दाखवून जनतेच्या हितासाठी काम करीत राहील असेही माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शेवटी म्हटले आहे.