जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यामध्ये दि २४ जुलै रोजी दिवसभर पावसाची संततधार होती. रात्रभर पावसाची रिपरीप सुरू होती मात्र दि २५ जुलै रोजी सकाळपासूनच तालुक्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या . हा पाऊस दुपारी २ वाजेपर्यंत पडला. या झालेल्या जोरदार पावसामुळे जळकोट तालुक्यातील अनेक छोट्या-मोठ्या नद्यांना पूर आला. धामणगाव ते ढोरसांगवी तसेच ढोर सांगवी ते लाळी बुद्रुक या दरम्यान असलेल्या नद्यांना पूर आला होता नदीचे पाणी पुलावरून वाहत होते यामुळे जवळपास सहा ते सात तास वाहतूक ठप्प होती तसेच जळकोट परिसरातील पाखंडेवाडी ते राज्य महामार्ग २२२ ला जोडणा-या रस्त्यावर असलेल्या नदीला पूर आला होता. या ठिकाणीही पुलावरून पाणी वाहत होते.
यामुळे या ठिकाणची वाहतूकही सहा ते सात तास ठप्प झाली होती. यासोबतच शेतक-यांंच्या शेतीला जाणारे छोटे ओढे भरून वाहत होते. यामुळे शेतीचे मार्गही बंद झाले होते. ढोर सांगवी ते धामणगाव दरम्यान असलेल्या नदीवरील पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी सरपंच प्रतिनिधी दिलीप सोनकांबळे यांनी केली आहे जळकोट तालुक्यात गत १७ जुलैपासून पाऊस पडत आहे. रिमझिम स्वरूपाचा पाऊस असला तरी पावसात सातत्य असल्यामुळे जमिनीला भरपूर पाणी आले आहे यामुळे पावसाचा पडलेला थेंब जमिनीच्या बाहेर निघत आहे. यामुळे थोडा जरी पाऊस पडला तरीही नदीला पाणी येत आहे. दि २५ जुलै रोजी सकाळपासून दुपारपर्यंत जोरदार पाऊस पडल्यामुळे अनेक नदी नाले भरून वाहिले.
यासोबतच जळकोट शहरालगत असलेला पाझर तलाव पूर्णपणे भरला आहे. अनेक वर्षानंतर जुलै महिन्यामध्येच हा पाझर तलाव भरला आहे. यासोबतच जळकोट तालुक्यातील अनेक साठवण तलावात पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सकाळपासूनच मोठा पाऊस पडत असल्यामुळे अनेक शाळांमध्येही विद्यार्थी संख्या रोडावली होती.