रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाने पंजाब किंग्ज संघाला पराभूत करून १८ वर्षांनंतर पहिल्यांदा आयपीएल चषकावर आपले नाव कोरले. या विजयानंतर बुधवारी बंगळुरूत आरसीबी संघाच्या विजयोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विजय रॅलीही काढण्यात येणार होती. संघ विमानतळावर दाखल झाला तेव्हा इतकी प्रचंड गर्दी झाली की ती पाहून नंतर काढण्यात येणा-या विजय रॅलीला परवानगी नाकारली. रस्त्यावर जमा होणा-या गर्दीमुळे संभाव्य रहदारी समस्या लक्षात घेऊन विजयी मिरवणुकीला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे कर्नाटक क्रिकेट संघटनेने एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आरसीबी संघाच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. त्याआधी विधान सौधात संघाचा सत्कार करण्यात आला. त्यावेळीही विधान सौधाबाहेर प्रचंड गर्दी जमली होती. तिकडे स्टेडियमही तुडुंब भरले होते. स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ३२ ते ३५ हजार आहे आणि बाहेर दोन लाख चाहते स्टेडियममध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत.
स्टेडियमचे बंद गेट उघडण्यासाठी लोकांची रेटारेटी सुरू, त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीमार मग लोकांची पळापळ सुरू, त्यात अनेकजण चिरडले गेले, काही जणांचे गुदमरून प्राण गेले. भीषण चेंगराचेंगरीत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये सात पुरुष, तीन महिला आणि एका बालिकेचा समावेश आहे. चेंगराचेंगरीत ३३ जण जखमी झाले असून त्यातील ११ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती आहे. दुस-या एका वृत्तानुसार ५० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. विजयी संघाची खुल्या बसमधून मिरवणूक काढली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे बंगळुरूच्या रस्त्यावर हजारोंच्या संख्येने चाहते जमा झाले होते. सायंकाळी साडेचार वाजता राज्य सरकारतर्फे विधान सौध आवारात आरसीबीच्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास संघ स्टेडियममध्ये दाखल झाला. कार्यक्रम सुरू होण्याआधीच बाहेर चाहत्यांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. त्यामुळे चाहत्यांवर नियंत्रण ठेवणे पोलिसांच्या आवाक्याबाहेर गेले. त्यांनी लाठीमार करून जमावावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी गेट क्र. १२ जवळ भीषण चेंगराचेंगरी झाल्याने अनेकजण पायदळी तुडवले गेल्याने गंभीर जखमी झाले.
काही जणांनी जागेवरच प्राण सोडले. जखमींना वैदेही, बौरिंग, लेडी कर्झन, विठ्ठल मल्ल्या आदी रुग्णालयांत दाखल करण्यात आले. ११ जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. चेंगराचेंगरीत १४ वर्षीय दिव्यांश या मुलीचा मृत्यू झाला. नववीत शिकणारी ही मुलगी आई-वडिलांसमवेत स्टेडियममध्ये आली होती. चेंगराचेंगरीत गुदमरून तिचा मृत्यू झाला. दुर्घटनेला ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे हे उघड आहे. पोलिसांना गर्दीचे नियोजन करता आले नाही. याआधी मुंबईत अनेकवेळा विजयी भारतीय संघाचे स्वागत करण्यात आले. २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे भव्य स्वागत करण्यात आले. तेव्हा चाहत्यांचा महासागर लोटला होता. परंतु मुंबई पोलिसांनी केलेल्या कौतुकास्पद नियोजनामुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. बंगळुरूमध्ये खेळाडूंना पाहण्यासाठी अतिउत्साही चाहते बॅरिकेड्स, संरक्षक भिंत ओलांडून आत शिरत होते. काही जण झाडावर चढून बसले होते, अनेकजण खाली पडून जखमी झाले. चाहत्यांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्याने विजयोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. हजारो चाहते विधान सौध आणि स्टेडियमबाहेर जमा होत होते. दुचाकी, चारचाकी, मेट्रो रेल्वे, बस आणि अन्य वाहनांद्वारे चाहते स्टेडियममध्ये येत होते.
अखेर गर्दीला नियंत्रित करण्यासाठी सायंकाळी साडेचार वाजता मेट्रो रेल्वे बंद करावी लागली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृतांप्रति संवेदना व्यक्त केली असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत. दुर्घटनेत आता राजकारण शिरले आहे. काँग्रेस सरकारच्या बेजबाबदारपणामुळे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली, अनेकांना जीव गमवावे लागले. गर्दी नियंत्रणासाठी कोणतेही उपाय करण्यात आले नव्हते. निष्पाप लोकांचे बळी जात असताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार क्रिकेटपटूंसोबत रील शूट करण्यात व्यस्त होते अशी टीका राज्य भाजपने केली आहे. आरसीबीच्या विजयोत्सवावेळी घडलेल्या दुर्घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आरसीबी व्यवस्थापनाने खुल्या बसमधून रोड शो करण्याचा निर्णय घेतला होता. पण रोड शो झाला नाही. सरकारने विधान सौध आवारात खेळाडूंचा सत्कार आयोजित केला होता. पावसामुळे १५ मिनिटांत हा कार्यक्रम पार पडला. परंतु स्टेडियममधील कार्यक्रम आम्ही आयोजित केला नव्हता असे सरकारचे म्हणणे आहे. सरळ सरळ हा जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे. चाहत्यांची गर्दी होणार हे स्पष्ट असताना सरकारने केलेली व्यवस्था तोकडी पडली हे उघड आहे. भारतातील क्रिकेटवेड सर्वज्ञात आहे. असे असले तरी चाहत्यांनी सुद्धा आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवायला हवी होती.
स्टेडियममध्ये मोफत प्रवेश असल्याने तुफान गर्दी होणार यात शंका नव्हती. त्यामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहण्यापेक्षा त्यांना दूरदर्शनवरही कार्यक्रम बघता आला असता दुसरे म्हणजे हा काही विजयी भारतीय संघ नव्हता. एका प्रादेशिक संघाचा विजय होता. प्रादेशिक अस्मिता मर्यादेतच राहायला हवी. त्यासाठी प्राणाची बाजी लावण्याची काहीच गरज नव्हती. संघ व्यावसायिक होता, त्यातील खेळाडू व्यावसायिक होते. त्यांनी करोडो रुपये कमावले होते. त्यांच्यासाठी आपले लाख मोलाचे प्राण गमावण्याची काय गरज? दुर्घटनेबद्दल प्रतिक्रिया देताना विराट कोहलीने म्हटले आहे, माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत, मी खूप दु:खी आहे. करोडो रुपयांची संपत्ती जमवलेला कोहली मृतांच्या कुटुंबियांना एक पैसाही देणार नाही. त्यामुळे आपण आपल्या जीवावर किती उदार व्हायचे ते चाहत्यांनीच ठरवायचे. विदेशात फुटबॉल सामन्यात, दंगली, चेंगराचेंगरीच्या घटना नेहमीच घडतात. भारतातही विशेषत: धार्मिक कार्यक्रमात अशा चेंगराचेंगरीच्या घटना घडतात. आनंद साजरा करताना भान ठेवायलाच हवे.