नगर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल हे काही तासांत समोर येणार आहेत. तर चार जूनला निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी मोठा दावा केला आहे. तब्बल दोन लाखांच्या फरकाने निवडून येणार, असे त्यांनी म्हटले आहे.
मला १०० टक्के विश्वास आहे की, निवडणुकीचा निकाल माझ्याच बाजूने लागणार आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली तेव्हा मी जाहीर केले होते की मी दोन लाखांच्या फरकाने विजयी होणार आहे. मी आजही माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, असे निलेश लंके यांनी म्हटले आहे. इतर उमेदवारांसारखे आपले आकडे कमी होत नाहीत, तर वाढतच आहेत.
कारण सर्वसामान्य जनता आपल्या सोबत आहे, असे म्हणत निलेश लंके यांनी अप्रत्यक्षरीत्या सुजय विखे पाटील यांना टोला लगावला. निवडणूक झाल्याबरोबर आपण इतरांप्रमाणे आराम करण्यासाठी कुठे गेलो नसून जनतेसोबत असल्याचे म्हणत माझे दैनंदिन काम सध्या देखील सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.