लातूर : प्रतिनिधी
धुळीत माखलेल्या बायांना जेव्हा अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य मिळेल तेव्हा जागतिक महिला दिन साजरा होईल. त्यासाठी सर्व महिलांना व्यक्त होणे लिहिते होणे आवश्यक आहे. जेव्हा त्या लिहू लागतील बोलू लागतील तेव्हा क्रांती घडून येईल. कारण चार ओळी लिहिण्यासाठी विचारांची गरज असते. त्याच विचारावर क्रांतीची मशाल पेटली जाते, असे प्रतिपादन पोलादी बाया पुस्तकाच्या लेखिका दीपा पवार यांनी व्यक्त केले.
सनराईज बहुउद्देशीय सामाजिक संस्था व दयानंद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दयानंद शिक्षण संस्था सभागृहात महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी दीपा पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, सनराईज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नंदिनी पडिले, सामाजिक कार्यकर्ते पर्यावरण तज्ज्ञ सुपर्ण जगताप, प्राचार्य क्रांती सातपुते, प्राचार्य पूनम नाथानी, उपप्राचार्य अंजली जोशी, उपप्राचार्य डॉ दिलीप नागरगोज, प्रशांत मन्नावार उपस्थिती होती.
पुढे बोलताना दीपा पवार म्हणाल्या, पोलादी बाया म्हणून महिलांची ओळख होणे आवश्यक आहे. शेवटच्या बँचवर बसणारे कुल वाटतात, मस्ती करणारे वाटतात पण खरंतर तेच क्रांती करतात. भटक्या जमातीतील मुले शाळेतील शेवटच्या बँचवर बसलेली असतात. पण सामाजिक योगदानामध्ये त्यांची क्रांती महत्त्वाची असते. महिलांची ओळख ही भावनिक न होता पोलादी बाया, अशी निर्माण होणे ही काळाची गरज आहे. नैसर्गिक रित्या बाळाला दूध पाजणे यातच खरे ज्ञान सामावलेले आहे. लाजेचा शोध घेण्यासाठी माझा प्रवास नसून नारीच्या नेतृत्वात अशक्य गोष्टी शक्य करून दाखवण्यासाठी माझा प्रवास आहे. पोलादी बाया हे पुस्तक वेदना आणि यातना यासाठी नसून कणखरपणाचे प्रतीक आहे असेही ते यावेळी म्हणाल्या.
प्रास्ताविक डॉ. अंजली जोशी यांनी केले. तर सनराईज संस्थेचे अध्यक्ष नंदिनी पडिले यांनी त्यांचा संघर्षमे जीवन प्रवास आणि पोलादी बाया हे पुस्तक वाचल्यानंतर लेखिकेचा प्रवास वाचून प्रभावित होऊन हा कार्यक्रम घेण्याचे मनाशी पक्के ठरवले होते, असे सांगितले. तर सुपर्ण जगताप यांनी दीपा पवार यांचा संघर्ष आणि कार्यक्रम घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली. प्राचार्य शिवाजी गायकवाड यांनी अध्यक्षीय समारोप केला. उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे यांनी आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन दीपरत्न निलंगेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नियोजन समिती सदस्य डॉ. अशोक नारनवरे, प्रा. दशरथ भिसे, प्रा. पंचशील डावकर, डॉ. बी. आर. पाटील, गणेश माशाळकर, डॉ. सीतम सोनवणे, श्याम जैन, डॉ गणेश गोमारे, आझम शेख यांनी सहकार्य केले.