रेणापूर : प्रतिनिधी
ऊस तोडी साठी घेतलेले २० हजार रुपयाची उचल परत घेण्याच्या कारणावरुन पानगाव येथील दोन तरुणांना तिघा जणांनी चार चाकी वाहनातून जबरदस्तीने उचलून घेऊन गेले होते. रेणापूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित कराड तालुक्यातील उंब्रज व यशवंत शुगर फॅक्टरी जि . सातारा येथून त्या तरुणांची सुटका केली मात्र पळवून घेऊन जाणारे तिघे पोलीसांना चकवा देऊन फरार झाले आहेत.
रेणापूर तालुक्यातील पानगव येथील मधुकर राजू साठे ( वय १८ वर्षे ७ महिने ) व संतोष मारुती हानवते ( वय २७ वर्षे ) या दोघांना विठ्ठल कसबे व अन्य दोन साथीदारांनी तू आमची उचल म्हणून घेतलेले २० हजार रुपये दे असे म्हणून त्यांनी सोबत आणलेल्या चारचाकी वाहनात ( बोलोरोत ) बसवून घेवून गेल्याचा प्रकार घडला. या प्रकरणाची फिर्याद नरसाबाई राजू साठे यांनी दि २७ डिसेंबर रोजी रेणापूर पोलीस ठाण्यात दिल्यावरून रेणापूर पोलासांनी गुरनं ४ ४३ / २३ कलम ३६३/ ३६४ (अ) ५०४ , ५०६ ,३४ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद केला. सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रेड्डी व पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जे बी मानुल्ला , पोलीस कर्मचारी बालाजी डप्पडवाड , राजेश यादव, नितीन मामडगे या कर्मचा-यांचे पथक तयार केले.
या पथकांने तपासाची चक्रे फिरवून कराड तालुक्यातील उंब्रज व यशवंत शुगर फॅक्टरी जि. सातारा येथे शोध घेतला असता पानगाव येथील साठे व हानवते हे दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणातील आरोपी पळुन जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान रेणापूर पोलीसांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.