लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात अवकाळी पावसाने मे अखेर १५ दिवस दमदार हजेरी लावली. जून महिणा उजाडताच कांही दिवस वगळता पावसाने गेल्या १० ते १५ दिवसापासून विश्रांती घेतली आहे. ज्या ठिकाणी जमिनीत ओल होती. अशा ठिकाणी जिल्हयात २९.६७ टक्के म्हणजेच १ लाख ७३ हजार ९११ हेक्टरवर शुक्रवार पर्यंत पेरण्या झाल्या आहेत. ज्या शेतक-यांनी पेरणी केली नाही. त्या क्षेत्रावरची ओल उडून गेली आहे. गेल्या १५ दिवसापासून पाऊस उघडल्याने ज्या शेतक-यांनी पेरणी केली व ज्यांनी अद्याप पेरणी केली नाही, असे शेतकरी धास्तावले आहेत.
गेल्यावर्षी जिल्हयात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. यावर्षी मान्सूनच्या पावसापूर्वीच अवकाळी पावसाने मे महिण्याच्या अखेरीस दमदार हजेरी लावली होती. या पावसाच्या जोरावरच अनेक शेतक-यांनी १ लाख ७३ हजार ९११ हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या उरकल्या आहेत. यात १ लाख ४६ हजार ३७० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. १४ हजार ९८७ हेक्टरवर तूर, २ हजार ३८५ हेक्टरवर मूग, १ हजार ५७९ हेक्टरवर उडीद, ५७९ हेक्टरवर ज्वारी, २५ हेक्टरवर बाजरी, ३८६ हेक्टरवर मका, ३६ हेक्टरवर तिळ, ४ हेक्टरवर भूईमुग अशा प्रकारे २९.६७ टक्के क्षेत्रावर खरीपाचा पेरा झाला आहे. मात्र या पिक वाढीसाठी जिल्हयात दमदार पावसाची गरज गाहे.