सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात रुवात झाली असून ठिकठिकाणी प्रचाराची हलगी कडाडली आहे. एकीकडे उमेदवारांच्या प्रचाराचा धुराळा उडतोय तर दुसरीकडे एरव्ही रोजगाराच्या शोधात राहणारे हलगी, ढोल-ताशा पथकांना मागणी चांगलीच वाढली आहे. सर्वच पक्षांकडून प्रचाराची सुपारी घेऊन या पथकांना धावाधाव करावी लागत आहे. शहरात सकाळी तर दुपारी ग्रामीण भागात अशा पद्धतीने प्रचारासाठी जावे लागत आहे. अशा कलावंतांची पोटाची खळगी भरण्यासाठी ओढाताण होत आहे.
ग्रामीण भागात सध्या लग्नसराईला जोरदार सुरुवात झाली आहे त्यातच गावोगावच्या यात्राही सुरू झाले आहेत. अलीकडच्या काळात यात्रा उत्सव तसेच लग्नसराई मध्ये सर्व युवकांना डॉल्बीचे वेड असते परंतु सध्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने डॉल्बी सारख्या मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपकांवर मोठे निर्बंध आले आहेत. त्यामुळे आपोआपच या सर्व उत्सवांमध्ये पारंपरिक वाद्यांना मागणी वाढली आहे.
एरव्ही काही काम नसल्याने रिकामे बसणारे पथक आता मात्र ओढाताण करुन वातावरण निर्मितीसाठी जावे लागत आहे. सकाळी एक पक्ष, दुपारी दुसरा तर सायंकाळी तिसराच पक्ष अशा सर्वच पक्षांकडून प्रचारासाठी सुपारी घेऊन वातावरण निर्मितीसाठी पळावे लागत आहे.शहरात प्रचाराच्या हालगी अजून नेत्यांच्या पातळीवरच घुमत असल्याने गाव व तालुका पातळीपर्यंत अजून शांतता आहे.
उमेदवार स्वतः येऊन प्रचार करत असल्याचे सर्वसामान्य जनतेच्या नजरेत अजून भरलेले नाहीत. आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराचा रंग भरण्यास सुरुवात होईल असे चित्र आहे.हलगी वाजवून वातावरण निर्मितीसाठी सर्वच पक्षांकडून प्रचारासाठी सुपारी या पथकांना दिली जात आहे. सध्या लग्न समारंभ, यात्रांमध्ये हलगी आणि डोल-ताशा वादकांना मोठी मागणी आहे. त्यामुळे या कलावंतांना रोजगार मिळत आहे. शहरात ४० पेक्षा बैंड पथक असले तरी केवळ ढोल-ताशा वादकांना मागणी आहे.