सोलापूर : वडिलोपार्जित जमीन वारस चार भावांनी रजिस्टर कार्यालयात शासकीय चलन भरून रीतसर वाटणीपत्र करून घेतले. साधारण २२ महिन्यांचा कालावधी लोटला तरी सातबारावर नोंद झाली नाही. तलाठी, तहसील कार्यालयातील संबंधित लिपिक व नायब तहसीलदार असा सातत्याने भेटण्याचा प्रयास करूनही नोंद काही लागली नाही.
उत्तर तहसील कार्यालयात कोणावर कोणाचे नियंत्रण नसल्याने शेतकरी, रेशनकार्डधारक पुरते वैतागले आहेत. संबंधित टेबलचे कर्मचारी कामही करीत नाहीत व टेबलवर सापडतही नाहीत. अधिकारी म्हणून कोणाकडे गाऱ्हाणे सांगावे म्हटले तर ऐकून घेण्याची कोणाची मानसिकता नसते. त्यामुळे पुरवठा विभाग व शेतकऱ्यांशी संबंधित विभागाच्या कारभाराबाबत तक्रारी कमी होत नाहीत.
नान्नज येथील भारत भागवत गवळी, हणमंत भागवत गवळी व त्यांच्या दोन मयत भावाच्या वारसाच्या नावावर वडिलांची जमीन रीतसर वाटणीपत्र ४ ऑगस्ट २०२२ रोजी करून घेतली. हा दस्त नोंदणीसाठी तांत्रिक कारणे जोडून तलाठ्यांकडून चाळले जात होते. याबाबत मंडल अधिकारी भडकवाड यांनी निर्णय देऊन अडचण दूर केली होती. नोंदीसाठी १६ ऑक्टोबर २०२२रोजी अर्ज दिला. त्यानंतर १० जानेवारी २०२४ रोजी नान्नज तलाठ्यांना अर्ज देऊन सातबारावर नोंद घेण्याची विनंती केली.
नान्नजचे तलाठी गडदे यांनी २० मार्च २४ रोजी तहसील कार्यालयाला अहवाल दिला. या अहवालावर तहसील कार्यालयातील लिपिकाने सातबारावर नोंद धरण्यासाठी आदेश काढले. नान्नजचे तलाठी गडदे यांनी भरत गवळी व इतरांच्या नोंदीबाबत उत्तर तहसीलला २६ मार्च २०२४ रोजी अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये तहसीलच्या जमा-२ च्या १६ नोव्हेंबरचा संदर्भ दिला आहे. म्हणजे १०० दिवसांनी तलाठ्याने वरिष्ठाच्या पत्राची दखल घेतल्याचे दिसत आहे.