लातूर : प्रतिनिधी
शील, सदाचार, करूणा, मैत्री आणि शांततेची शिकवण हे भगवान बुध्दांचे व्यावहारिक व आध्यात्मिक तत्वज्ञान असुन समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्याय तथागत बुध्दांचा समग्र जगाला वैश्विक संदेश आहे. भगवान बुध्द संपूर्ण आशिया खंडाचे दिपस्तंभच ठरले आहेत. समाजास बुध्दीप्रामाण्यवादी, विज्ञानवादी आणि सुसंस्कारी बनवने हे बुध्द शिकवणीचे ध्येय आहे. अशा या भारताच्या महत्तम युगप्रवर्तक महामानव ठरलेल्या तथागत भगवान बुध्दांची जयंती आज जगभरात मोठ्या उत्साहात साजरी होतांना लातूर शहरातही मोठया उत्साहात पु. भिक्खु पय्यानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती यांच्या सौजन्याने तथागत बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस भंते बुद्धशील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पंचशील धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी धम्मसंदेश रॅली काढण्यात आली. या वेळी हजारोच्या संख्येने बौद्ध उपासक, उपासिका शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते. या धम्मसंदेश रॅलीमध्ये समता सैनिक दलाचीही परेड झाली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती मंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. पु. भिक्खु पय्यानंद थेरो यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. त्रिशरण पंचशीलानंतर शुभेच्छापर बोलताना भिक्खु पय्यानंद थेरो यांनी सर्व भारतीयांना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व धम्मसंदेश रॅलीचा समारोप करण्यात आला.
यावेळी केशव कांबळे, विनोद खटके, भिमराव चौदंते, सुजाता अजनीकर, प्रा. देवदत्त सावंत, सुशील चिकटे, कुमार सोनकांबळे, जि. एस. साबळे, शोभा सोनकांबळे, वसंत वाघमारे, पांडुरंग अंबुलगेकर, साधू गायकवाड, लाला सुरवसे आदीसह मोठया संख्येने उपासक उपासिका उपस्थित होते.