पालकमंत्री तानाजी सावंत यांचा भरसभेत इशारा
धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी थेट अजित पवार यांच्यासमोरच शिवसेनेचा असाच एक-एक मतदारसंघ कमी होत राहिला तर आम्ही सहन करणार नाही, असा इशारा दिला. धाराशिवचा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला.
आज येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील आहेत. थोडे परखड बोलतो. धाराशिवमध्ये महायुतीचा प्रचार हा जानेवारीमध्येच सुरु झाला आहे. २६ जानेवारीपासून धनंजय सावंत यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. खरे तर हा मतदारसंघ पारंपरिक पद्धतीने शिवसेनेचा आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या महायुतीच्या नेत्यांनी धाराशिव मतदारसंघ महायुतीमधील राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय घेतला. पण अशाच पद्धतीने शिवसेनेचा एक-एक मतदारसंघ कमी होत राहिला तर हा शिवसैनिक आणि मी स्वत: हे सहन करणार नाही, असे सावंत म्हणाले. याचवेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी अर्चना पाटील यांना लीड द्यायची आहे, असेही ते म्हणाले.