लातूर : प्रतिनिधी
स्वच्छ, सुंदर आणि हरित लातूरची संकल्पना साकारत असताना विकसीत लातूर शहरात फुटपाथचे अस्तित्व मात्र नष्ट झाले होते. त्यामुळे पादचा-यांना भर रस्त्यावरुन ये-जा करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेता लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने पुन्हा एकदा अतिक्रमण विशेषत: फुटपाथवरील अधिकृमणे काढण्यास दि. २३ जूनासून सुरु केले आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन पायी चालणा-या नागरिकांच्या सोयीसाठी लातूर शहर महानगरपालिकेने मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा फुटपाथची सोय केली आहे. परंतु, शहरातील जवळपास सर्वच फुटपाथवर विक्रेते, व्यापा-यांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणामुळे फुटपाथ नेमके कोणासाठी पायी चालणा-या नागरिकांसाठी की, विक्रेते, व्यापारी यांचे साहित्य ठेवण्यासाठी?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात फुटपाथ शिल्लकच दिसत नाही. महात्मा गांधी चौक ते गंजगोलाई या मुख्य रस्त्यावर दुतर्फा पान टप-या, विविध व्यवसायिकांची साहित्य, फुल विक्रेते, घड्याळ दुरुस्तीची दुकाने, चहा टपरी, कपडे व्यापारी, दुकानासमोरी शेड यामुळे फुटपाथचे अस्तित्वच संपले आहे.
लातूर शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी मोठा पोलीस बंदोबस्त सोबत घेत महात्मा गांधी चौक ते गंजगोेलाई या रस्त्यावर जवळपास ४० अतिक्रमणे काढली. दरम्यान अनेक छोट्या व्यावयायिकांनी हा आमच्यावर अन्याय आहे. आम्ही ३० ते ३५ वर्षांपासून इथे व्यावसाय करुन आमचा उदरनिर्वाह चालवतो, अशी तक्रार मांडली. परंतु, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता अतिक्रमण काढण्यात आले. अतिक्रमण हटावच्या या मोहिमेत या विभागाचे प्रमुख रवि कांबळे, दत्ता पवार, बंटी उबाळे, आतिश गायकवाड, सूनील कांबळे, महेंद्र घोडके तसेच गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बी. जी. चित्ते, जमादार दत्ता शिंदे, आरसीबी व इतर जवान, महापालिकेचे कर्मचारी यांचा समावेश होता.