मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात शालेय शिक्षणाचा खेळखंडोबा झालाच आहे. त्यात फडणवीस सरकारने पहिलीपासून हिंदी ही तिसरी भाषा सक्तीची करण्याचा तुघलकी निर्णय घेतल्याने मराठी मने दुखावली आहेत, पण नुसत्या दुखावण्याने किंवा हात चोळत बसण्याने काय होणार? काही मराठी नट, लेखक, कवी मंडळींनी निषेधाचे सूर काढले आहेत, पण तेही मर्यादित आहेत. निदान मराठी चित्रपट, नाटक कलावंतांनी तरी या सक्तीविरुद्ध पुढे यावे, तर तेही नाही. आता तरी या मंडळींनी ‘खोबरं तिकडे चांगभलं’ अशा भूमिकेत राहू नये, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनावले आहे.
दक्षिणेतील अभिनेता प्रकाश राज याने ज्या खणखणीतपणे तेथील सरकारला आणि केंद्रालाही बजावले की, आमच्यावर हिंदी लादाल तर याद राखा. आमचा भाषा म्हणून हिंदीला विरोध नाही, पण आमची मातृभाषा हीच आमची सांस्कृतिक ओळख आणि आत्मसन्मान आहे. त्यावर आक्रमण कराल तर याद राखा. आपल्या मराठी भाषेसाठी अशी मशाल हाती घेऊन किती जण पुढे आले? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखात केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांच्या दबावाखाली तथाकथित मराठी भाषेचे लेखक, कलाकार मंडळी गुदमरून गेली किंवा सरकारचे लाभार्थीच बनल्याने ‘लाडक्या बहिणी’प्रमाणे हे सर्व लोक लाडके कलावंत, लाडके लेखक बनले आहेत. आता कवी हेमंत दिवटे यांनी या हिंदीसक्तीला विरोध म्हणून महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करण्याचे ठरवले आहे, असे त्यांनी अग्रलेखात नमूद केले आहे.