मुंबई : वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटण्याचे नाव घेत नाही. दोन्हीकडून टोलवाटोलवी सुरू आहे. यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी मविआला टोला लगावला आहे.
मविआने दिलेल्या जागा आम्ही परत करत असल्याचे ते म्हणाले. आम्हाला कुठे ना कुठे समाविष्ट करून घ्यावे असा त्यांचा विचार चाललाय. काही ठिकाणी मतभेद झाले आहेत. काँग्रेसने यादी जाहीर केली आहे. पण मतभेद असलेल्या मतदारसंघाबद्दल काही झालं नाही. शिवसेनेनेही यादी जाहीर केली नाही. आम्ही बसायला तयार आहोत, असेही ते म्हणाले. मविआने दिलेल्या ४ जागांचा प्रस्ताव त्यांना परत करतो. मी त्यांना ४ जागा परत देतोय. पण अधिकृतपणे प्रत्यक्षात त ३ जागा देत आहेत. २६ तारखेला आमची भूमिका आम्ही जाहीर करू.
लहान पक्षांचा समावेश करून घ्यावा अशी मागणी महाविकास आघाडीकडे केली होती. त्यांनी ती पूर्ण केली नाही. मतभेद असलेले मतदार संघ काँग्रेसने जाहीर केले नाहीत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आक्षेप घेतला नाही, असेही ते म्हणाले. ज्यापद्धतीने उमेदवार पळवापळवी चालली आहे, त्यावरून यांची ताकद काय ते कळाले. इतर पक्षांना खिळखिळे करा. त्यांची ताकद ठेवू नका. मग आपल्याला जिंकता येईल, अशी भाजपची स्ट्रॅटेजी असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली. ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असते, त्याला वेळ लागतो. अन्यथा आम्हाला अर्धा तासात फॉर्म भरता येईल.
मतभेदाच्या जागांचा प्रश्न आधी सोडवा
काँग्रेस आणि शिवसेना गोंधळ घालतेय, असे आम्ही करत नाही. मतभेदाच्या जागांचा प्रश्न आधी सोडवा असे आम्ही सुरुवातीपासून सांगत आलोय. वंचित आम्हाला प्रतिसाद देत नाही, असे काहीही म्हणतात. आमच्या १५ जागांचा प्रश्न सुटलाय हे त्यांनी सांगावं, असे प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला उद्देशून म्हटले. तसेच ४०० पार अशी घोषणा देतात म्हणजे संविधान बदलण्याच्या दृष्टीने पाऊल असल्याचा आरोप त्यांनी केला.