लातूर : विनोद उगीले
तुर डाळीचे दर गगनाला भिडत चालले आहेत. जिवनावश्यक वस्तुची उपलब्धता व किंमतीत स्थिरता राखण्याचा कायद्या आमलात येऊन तो कागदावरच असल्याने दाळ उत्पादनात आघाडीवर असलेल्या लातूरात उत्पादक व व्यापा-यांनी ‘दाल’ साठवणूकीचा ‘काला’ केल्यानेच आज घडीला तुरदाळ १८० रूपये प्रतिकिलो दरा पर्यंत पोहचली आहे. असे असताना संबधित महसूल विभाग हातावर्र हात ठेऊन गप्प आहे. वेळीच साठेबहाद्दरावर कारवाईचा बडगा उगारल्यास जिल्ह्यातील वेअर हाऊस मधून दाळीचे मोठे घबाड हाती लागणार असून तसे किरकोळ व्यापारी व नागरिकांतून बोलले जात आहे.
लातूर जिल्ह्याची ओळख डाळींच्या पिकांसाठी आहे. येथे तूर, हरभरा, उडीद आणि मूग ही पिके घेतली जातात. लाल रंगाच्या तुरीचे आगर म्हणून ‘लातूर’ हे नाव पडले, असेही म्हटले जाते. शिवाय, शेजारच्या कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात तूर विक्रीसाठी लातूर व उदगीरला आणली जाते. येथील बाजार समितीत त्याच दिवशी माप होऊन शेतक-यांना पैसे दिले जातात. राज्यातील इतर बाजारपेठांच्या तुलनेत चांगला दर मिळतो. त्यामुळे महाराष्ट्राबरोबरच तेलंगणा, कर्नाटकातून शेतमाल विक्रीसाठी येतोÞ. तसेच लातूर हे डाळींचे आगार असून येथून संपूर्ण देशभरात डाळींची निर्यात होते. जिल्ह्यातील जवळपास १५० डाळ मिलमधून रोज तीन ते साडेतीन हजार टन डाळ तयार होते.
अख्ख्या भारताला इथल्या डाळीचा पुरवठा होतो. ही डाळ आंध्र प्रदेशातील कर्नुलपासून तमिळनाडूतील कन्याकुमारीपर्यंत पाठवली जात आहे. त्यामुळे लातूरला डाळींचे आगार मानले जाते. आता हेच लातूर तुरडाळीचे दर गगणाला भिडत चालल्याने चर्चेत आले आहे. डाळ उत्पादकांनी व व्यापा-यांनी डाळीचा अनाधिकृत पणे जिल्ह्यातील शकडो वेअर हाऊस मध्ये साठा केल्यानेच तुरडाळीच्या दरात वाढ होत चालल्याचे बोलले जात आहे. यामुळे सर्वसामान्यांना अर्थिक भुर्दंड बसत असून याकडे संबधित महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. जर महसूल विभागाने जिल्ह्यातील साठेबहाद्दरावर वेळीच कारवाईचा बडगा उगारलातर डाळीचे मोठे घबाड हाती लागेल असे किरकोळ व्यापारी व नागरिकांतून बोलले जात आहे.