रायगड : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीतील दोन प्रमुख घटकपक्षांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील तणाव चिघळला आहे. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करत, थेट राजीनाम्याचे आव्हान दिले आहे. या स्फोटक विधानामुळे रायगडमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
दरम्यान, महेंद्र थोरवे यांनी म्हटले आहे की, सुनील तटकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. मतदारसंघात आमच्या विरोधात काम केले जात आहे. जर त्यांनी राजीनामा दिला, तर मीही राजीनामा द्यायला तयार आहे. शिवसैनिकांच्या पाया पडेन, पण राष्ट्रवादीपुढे कधीही झुकणार नाही. या विधानामुळे महायुतीतील तणाव समोर आला असून शिंदे गटातील नाराजी स्पष्ट दिसून येत आहे.
काठावर वाचलेले आमदार : तटकरे
थोरवे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सुनील तटकरे यांनी थोरवे यांना काठावर वाचलेले आमदार अशी उपमा देत टोला लगावला. त्यांनी सूचकपणे हेही म्हटलं की, लोकशाहीत निवडणूक ही जनतेच्या आधारावर लढायची असते, आरोप-प्रत्यारोप करून आधारशून्य राजकारण करणे योग्य नाही, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.
महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा उघड
या राजकीय संघर्षामुळे महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. निवडणूकपूर्व युती असली तरी काही भागांमध्ये स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद अधिक तीव्र झाले आहेत. विशेषत: कर्जत-खालापूर मतदारसंघात हा संघर्ष आता थेट प्रतिष्ठेचा बनला आहे.
आगामी निवडणुकीवर परिणाम?
या राजकीय वादाचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या तरी रायगडमधील हे वातावरण महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते.