लातूर : प्रतिनिधी
लातूर शहराची सर्वांगीण प्रगती होत असताना कष्टक-यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी त्यांना अन्न, वस्त्र, निवारा यासह आरोग्य, शिक्षण व इतर सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.
लातूर येथील इमारत व इतर बांधकाम करणा-या कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या कामगार मंत्रालय तसेच इमारत व इतर बांधकाम कामगार कार्यालय, लातूर यांच्या वतीने दि. १४ मार्च रोजी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर चौक येथे लातूर शहरातील इमारत व इतर बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांडे संचाचे वाटप करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते. या वेळी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, माजी महापौर दीपक सूळ, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, व्हाईस विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, गणेश एसआर देशमुख, माजी नगरसेवक रविशंकर जाधव, सुंदर पाटील कव्हेकर, अजगर पटेल, कामगार अधिकारी मंगेश झोले आदींसह काँग्रेसचे विविध पदाधिकारी कामगार, नागरिक उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख या वेळी म्हणाले की, समाजातील गरजवंतांना जीवन उपयोगी वस्तूंचे वाटप आज होत आहे. यातून त्यांच्या संसाराला चांगला हातभार लागत आहे. हे एक समाजसेवेचे काम आहे आणि असेच काम काँग्रेस पक्षाला अभिप्रेत आहे. कालच काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीचे घोषणापत्र जाहीर केले आहे. यामध्ये गरजू महिलांना वर्षाला १ लाख रुपये काँग्रेस पक्ष देशात सत्तेवर आल्यावर बँक खात्यावर जमा करणार आहे, असा जाहीरनामा काँग्रेसने जाहीर केला. यामुळे महिलांनी काँग्रेस पक्षाला साथ दिली पाहिजे, असे सांगून असा हा कार्यक्रम लातूर शहरातील इतर प्रभागातही घ्यावा, अशा सूचना त्यांनी संबंधितांना केल्या.