25.9 C
Latur
Tuesday, June 17, 2025
Homeसंपादकीय....‘मृत्युवाहिनी’!

….‘मृत्युवाहिनी’!

मुंबईकरांची ‘लाईफलाईन’ म्हणून ओळखली जाणारी उपनगरी लोकलसेवा दिवसेंदिवस जीवघेणी ठरू लागली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास मृत्यूचे तांडव पहावयास मिळाले. दोन विरुद्ध दिशेने जाणा-या लोकल गाड्या वळणावर एकमेकाजवळून जाताना लटकणारे प्रवासी एकमेकांना घासले गेल्याने १३ प्रवासी लोकलमधून खाली पडले. त्यात ८ प्रवाशांना प्राणास मुकावे लागले. ९ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अपघाताची रेल्वे प्रशासनाकडून कसून चौकशी सुरू आहे. उपनगरी रेल्वे मार्गावर दररोज लाखो प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. काही वेळा चेंगराचेंगरीत तर काही वेळा घाईघाईत रेल्वेमार्ग ओलांडताना त्यांचा जीव जातो. लोकलमध्ये चढताना लोंढेच्या लोंढे घुसतात आणि उतरताना लोंढेच्या लोंढे एकमेकांवर कोसळतात. कसाराहून ७.२२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसएमटी) निघालेली लोकल नऊच्या सुमारास मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान पोहोचली. या लोकलला दिवा थांबा असल्याने प्रचंड गर्दी झाली होती.

लोकलच्या दरवाजाला लटकून प्रवासी प्रवास करत होते. मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ जलद मार्गिकेवर तीव्र वळण आहे. लोकल दरवाजाला लटकून प्रवासी प्रवास करत होते. रेल्वेमार्गाला असलेले वळण आणि लोकलचा वेग यामुळे दरवाजावर लटकत असलेले प्रवासी एकमेकांवर धडकून काही प्रवासी खाली पडले असण्याची शक्यता आहे. दोन्ही लोकल वेगात असल्यामुळे दोन्ही लोकलमधील प्रवाशांच्या बॅगा एकमेकांवर आदळल्याने प्रवाशांचा तोल गेला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेनंतर रेल्वे रुळांवर पडलेल्या प्रवाशांना तातडीने कळवा आणि ठाणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुंब्रा-दिवा स्थानकादरम्यान रेल्वेप्रवासी लोकलमधून पडल्यानंतर त्याचे ठोस कारण मध्य रेल्वेला उशिरापर्यंत सांगता आले नाही. ठाणे-कसारा रेल्वेमार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. गत १५ महिन्यांत या मार्गावर लोकलच्या विविध अपघातांमध्ये ६६३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे-कसारा व बदलापूर भागात राहणा-या प्रवाशांचा रेल्वे प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा बनला आहे. दररोज हजारो प्रवासी लोकलच्या दरवाजांना, रिकाम्या जागांमध्ये लटकून प्रवास करतात. यामुळे दररोज लोकलमधून पडून प्रवाशांचे अपघात होत आहेत.

१ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत रेल्वे रूळ ओलांडताना आणि धावत्या लोकलमधून पडून ६६३ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईची जीवनवाहिनी असलेली रेल्वे मृत्युवाहिनी ठरली आहे. मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघाताला जबाबदार कोण? प्रवासी की रेल्वे प्रशासन? याचा खल कित्येक महिने करून चौकशीचे आदेश, समित्या नेमण्याच्या घोषणा करत सत्ताधारी-विरोधक यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांपेक्षा, लोकल रेल्वेच्या विशेषत: सकाळच्या वेळेतील भयंकर गर्दीचा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने रेल्वे प्रशासनाने पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रवासी संघटनांनी सुद्धा सहकार्य करणे अतिशय गरजेचे आहे. मुंबईतील स्थानकांचे सुशोभीकरण करण्यात व्यस्त असणा-या रेल्वे प्रशासनाने कमाल गर्दीच्या वेळी होणा-या दयनीय अवस्थेकडे लक्ष द्यायला हवे. प्रचंड गर्दीतून प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो, मग तो पहिल्या वर्गाचा असो की दुस-या वर्गाचा. वेळेवर कार्यालयात पोहोचणे हेच नजरेसमोर ठेवून नाइलाजास्तव दरवाजाबाहेर उभे राहून प्रवास करणा-या प्रवाशांची संख्याही खूप असते.

त्यात आठवड्यातून दोन-तीन दिवस तरी मध्य रेल्वे उशिराने धावत असते. त्याबाबतच्या कोणत्याही सूचना न दिल्यामुळे प्रवाशांचा होणारा गोंधळ नित्याचा झाला आहे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानकाबाहेर रुग्णवाहिका असणे अत्यावश्यक असतानासुद्धा नियम न पाळणारे रेल्वे प्रशासन रेल्वे प्रवाशांच्या जीवाचे मोल ओळखते का हा प्रश्नच आहे. लोकल प्रवासात प्रवाशांचे बळी जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाय केल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून केला जात असला तरी एकूण आकडेवारी पाहता त्यात काही तथ्य दिसत नाही. मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळची घटना लोकल प्रवास किती असुरक्षित झाला आहे, हे अधोरेखित करणारी आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांना प्रचंड गर्दीत केवळ नाइलाजाने लोकल प्रवास करावा लागतो. लोकलचा प्रवास परवडणारा व व्यवहार्यच असतो यात दुमत नाही. त्यामुळेच प्रवासी लोकलला सर्वाधिक पसंती देतात. मात्र, अशा दुर्घटना म्हणजे प्रवासी सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना आखण्यात रेल्वे प्रशासनाला आलेले अपयश लपून राहत नाही.

लोकल प्रवासात दररोज काही प्रवासी आपले प्राण गमावत असताना रेल्वेने कोणतीच प्रभावी उपाययोजना न करणे हे मनाला पटणारे नाही. मुंबई लोकल ही टोकियोनंतरची दुसरी व्यस्त रेल्वे व्यवस्था मानली जाते. परंतु रेल्वे अपघातात होणा-या मृत्युदराचे काय? प्रति हजार प्रवाशांमागे न्यूयॉर्कमधील मृत्युदर २.६६ तर लंडनमध्ये १.४३ आहे. त्या तुलनेत मुंबईचा मृत्युदर ३३.८ आहे. यावरून मुंबई लोकलची परिस्थिती किती चिंताजनक आहे हे दिसून येते. लोकलमध्ये प्रचंड गर्दीमुळे होणारे प्रवाशांचे हाल अमानुष म्हटले पाहिजेत. लोकलच्या फे-या कितीही वाढवल्या तरी तितक्याच पटीने प्रवाशांची भर पडतच राहते. त्यामुळे फे-या वाढवण्यालाही काही अर्थ उरत नाही. या परिस्थितीवर सरकार आणि रेल्वे विभाग कोणताच तोडगा काढू शकलेले नाही. सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेला आपला दृष्टिकोन आणि मानसिकता बदलावी लागेल. राजकीय नेतेमंडळींना लोकल प्रवास करण्याची वेळ येत नाही. त्यामुळे सामान्य जनता किती वाईट अवस्थेत प्रवास करते याची त्यांना कल्पना येणार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR