प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात मोठा रस्ते अपघात झाला आहे. भरधाव वेगात आलेल्या टँकरने दुचाकीला धडक दिली. यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाचही मृत्यूदेह ताब्यात घेतले असून, कायदेशीर कारवाई करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मुख्यमंत्री योगी यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरयम्मरेज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोरो पेट्रोल पंपाजवळ आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास टँकर आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. दुचाकीवर आठ महिन्यांच्या मुलीसह पाच जण होते. टक्कर इतकी जोरदार होती की सर्वजण दूर फेकले गेले आणि जागीच ठार झाले.
पोलीसांनी सांगितले की, सर्व मृत जौनपूर जिल्ह्यातील मीरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील चौकी खुर्द भागातील रहिवासी होते. एका लग्नात सहभागी होऊन ते घरी परतत असताना हा अपघात झाला.पोलिसांनी टँकर ताब्यात घेतले असून, चालकाला अटक करण्यात आली आहे.