24.5 C
Latur
Thursday, June 26, 2025
Homeलातूरयेल्लोरीवाडी येथे महिलांची शेती शाळा

येल्लोरीवाडी येथे महिलांची शेती शाळा

औसा : प्रतिनिधी
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये येलोरी, येल्लोरेवाडी, गुळखेडा व रिंगणी या गावांचा समावेश झाला आहे. सदर प्रकल्पामध्ये प्रत्येक सहाय्यक कृषी अधिकारी यांना एका शेती शाळेचे नियोजन देण्यात आलेले आहे.  औसा तालुक्यातील १४ शेती शाळेपैकी ७ शेतीशाळा या १०० टक्के महिला शेतक-यांच्या तर उर्वरित शेतीशाळा या सर्वसाधारण शेती शाळा आहेत. चार गावांचा समावेश नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये झाला आहे. चंद्रकला लातूरे या एकमेव सहाय्यक कृषी अधिकारी आहेत. त्यांना शेतक-याबद्दल असलेली आस्था, कामाची आवड व धडाडी याचबरोबर नियोजनबद्ध पद्धतीने काम करून शेतक-यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता कशी वाढवावी यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. येलोरीवाडी येथे त्यांनी महिलांची शेतीशाळा घेतली. यामध्ये माती परीक्षण, पेरणीचे नियोजन, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, बियाणे उगवण क्षमता चाचणी , बीज प्रक्रिया व आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्रत्यक्ष पेरणी याबद्दल त्यांनी शेतक-यांना मार्गदर्शन करून प्रत्यक्ष पेरणी करून घेतली.
यासाठी एका यजमान महीला शेतक-याचा प्लॉट निवडण्यात आलेला आहे. शेती शाळेच्या त्या प्लॉट शेजारीच एक नियंत्रण प्लॉटही घेण्यात आला आहे, त्यावर ही पेरणी करण्यात आली. नियंत्रण प्लॉटवर पारंपारिक पद्धतीने बाबी राबविल्या जाणार आहेत तर शेतीशाळेच्या या प्लॉटवर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून एकात्मिक पीक व्यवस्थापन केले जाणार आहे. सोयाबीन पिकाचा उत्पादन खर्च करून उत्पादकता वाढविणे हे प्रमुख उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून शेतीशाळेद्वारे तंत्रज्ञान गावांमध्ये रुजविण्यावर भर दिला जाणार आहे.  बीज प्रक्रिया, रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी, किडींची ओळख, विविध वाणांची माहिती, खताचा समतोल वापर, पीक संरक्षणासाठी एकात्मिक पद्धतीने कीड व रोग नियंत्रण पद्धती व संरक्षित पाणी देण्याची योग्य पद्धत व अवस्था याबद्दल शेती शाळेतील ३० महिलांना माहिती देऊन व निरीक्षणे त्यांची निर्णय क्षमता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.  सदरची शेती शाळा ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अ‍ॅपवर ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. चंद्रकला लातुरे यांच्याकडे राष्ट्रीय खाद्यतेल अभियान – तेलबिया अंतर्गत सोयाबीन पिकाचे येल्लोरी व यल्लोरीवाडी येथे दोन प्रकल्प आहेत तर गुळखेडा येथे राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान अंतर्गत कडधान्य पिकांचा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR