लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेने शहरातील व्यापा-यांना बाजार परवाना त्वरित काढण्या संदर्भाने नोटीस दिल्या आहेत. महापालिकेच्या या कृतीच्या विरोधात शहरातील व्यापा-यांनी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडे तक्रार केल्या असून महापालिकेच्या या जाचक आणि न परवडणा-या परवान्याची अट रद्द करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती ही केली होती, त्याअनुषंगाने माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या सूचनेवरून दि. २३ जून रोजी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयुक्त श्रीमती मानसी, उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांना ही अट रद्द करावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले.
शिषटमंडळाने आयुक्त श्रीमती मानसी, व उपायुक्त खानसोडे यांना भेटून बाजार परवान्यासाठी आकारण्यात येणारी फीस ही अवाजवी असल्याचे नमूद करून या नव्या कराचा उल्लेख अर्थसंकल्पात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. या परवान्यासाठी मागणी करण्यात आलेली कागदपतत्रेही शासन निर्णयाच्या विरुद्ध असल्याचे आणि प्रशासन काळात झालेला ठराव हा कायदेशीर तरतुदी विरुद्ध असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे बाजार परवान्याच्या संदर्भातील नोटिसबाबत फेरविचार करावा सदरील नोटीस तात्काळ स्थगित, द्द करण्यात यावी अशी विनंतीही निवेदनाद्वारे यावेळी केली. सदर चर्चेअंती आयुक्तांनी महानगरपालिकेच्या या बाजार परवाना नोटीसींना तात्काळ स्थगिती देत असल्याचे सांगितले आहे.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, लातूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. डॉ. स्मिता खानापूरे, अशोक गोविंदपुरकर, रविशंकर जाधव, अॅड. फारुख शेख, कैलास कांबळे, प्रा. प्रविण कांबळे, अकबर माडजे, रईस टाके, तब्रेज तांबोळी, इम्रान शेख, पवनकुमार गायकवाड, महेश कोळ्ळे, यशपाल कांबळे, आयुब मनियार, राहूल डुमणे यांची उपस्थिती होती.