मुंबई : विशेष प्रतिनिधी
गेल्या सात वर्षांत केबल टीव्ही व्यवसायातील लाखो जणांनी रोजगार गमावले असल्याचे ‘स्टेट ऑफ केबल टीव्ही डिस्ट्रीब्युशन इन इंडिया’ने आपल्या सर्वेक्षण अहवालात नमूद केले आहे. २०१८ ते २०२५ या कालावधीत पैसे भरून केबल टीव्ही सेवा घेणा-यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. २०१८ मध्ये केबल टीव्ही ग्राहकांची संख्या तब्बल १५.१ कोटी होती. २०२४ मध्ये ती ११.१ कोटीवर आली आहे . ही संख्या २०३० पर्यंत आणखी घटून ७.१ ते ८.१ कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
अवघ्या सात वर्षांपूर्वी देशभरात केबल टीव्ही ग्राहकांची संख्या १५.१ कोटी होती. मात्र यानंतर ग्राहकांच्या संख्येत सातत्याने घट झाली आहे. यामागे चॅनल शुल्कात वाढ, ओटीटी प्लॅटफॉर्म्समधून मिळणारी वाढती स्पर्धा आणि डीडी फ्री डिशसारख्या विनामूल्य सेवांचा वाढता वापर, अशा कारणांमुळे ग्राहकांमध्ये घट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
चार प्रमुख डीटीएच (डायरेक्ट-टू-होम) कंपन्या आणि १० मोठ्या एमएसओज (मल्टी-सिस्टम ऑपरेटर्स) यांच्या मिळकतीत २०१८ पासून १६ टक्के घट झाली असून, त्यांचा नफा २९% ने घसरला आहे. वित्तीय वर्ष २०१९ मध्ये या कंपन्यांची एकत्रित उलाढाल २५,७०० कोटी रुपये होती, जी वित्तीय वर्ष २०२४ मध्ये २१,५०० कोटी रुपयांवर आली आहे.
स्थानिक पातळीवर केबल ऑपरेटरचे चित्र अधिक चिंताजनक आहे. २०१८ पासून स्थानिक केबल ऑपरेटसच्या ग्राहक संख्येत तब्बल ९३% घट झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. अर्ध्याहून अधिक स्थानिक केबल ऑपरेटरच्या मासिक उत्पन्नात घट झाली आहे. एक-तृतीयांशहून अधिक केबल ऑपरेटरांनी ४०% पेक्षा जास्त ग्राहक गमावल्याचेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
‘ईवाय’ इंडिया मधील मीडिया व एंटरटेनमेंट क्षेत्रातील भागीदार आशिष फेर्वानी यांनी म्हटले आहे की, संकटांनंतरही केबल उद्योगात वाढीची संधी आहे, फक्त ब्रॉडकास्टर्स, डिस्ट्रीब्युटर्स आणि धोरणकर्त्यांनी योग्य पावले उचलली पाहिजेत. कमी किमतीचे सबस्क्रिप्शन प्लॅन्स, स्वस्त टीव्ही सेट्स आणि सेट-टॉप बॉक्स यांच्याद्वारे सुमारे १० कोटी घरांपर्यंत पोहोचता येऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.